Wednesday 3 February 2010

ट्रेक टू अरावली - 'माउंट अबू'कडे प्रयाण ... !

ट्रेकच्या चौथ्या दिवशी सकाळी अखेर सर्व 'जडबुद्धी' लोकांचे शेवटचे घोराख्यान संपले. आम्ही उठून निघायची तयारी केली. गेस्टहाउसच्या बाहेर पडलो. जंगलातली सकाळ म्हणजे कशी एकदम आल्हाददायक ताजीतवानी असते. हळूवार वाहणारे वारे आणि पानांची होणारी सळसळ, त्यामधून येणारे पक्ष्यांचे गुंजन, सर्वच कसे एकदम मनाला नवी चेतना देणारे. नळावरती थंडगार पाण्याखाली हात घालून तोंड धुवून घेतले आणि ब्रश तोंडात घातला तर... अररर... हे काय टूथपेस्टच्या जागी झाडपोला मलम...!!! डोळ्यावर होती-नव्हती ती झोप उडली. सकाळ-सकाळ तोंडाची चव बिघडली. नशीबाने दिपककडे एक ब्रश होता. मग तो घेतला आणि दात घासले. ख़राब झालेला ब्रश कागदात गुंडाळून सामानात कोंबला. लक्ष्यात ठेवा... निसर्गात काही म्हणजे काहीही टाकायच्या विरोधात आहोत आम्ही.

"मागे ठेवायच्या त्या फ़क्त पाउलखूणा आणि सोबत घ्यायच्या त्या फ़क्त आठवणी."



नाश्त्याला चक्क पोहे बनवले होते. ते सुद्धा अनुजाने. आज नाश्ता काय आहे ते बघायला घुसली किचनमध्ये आणि पोहे बघून मग त्याला ज़रा आपला 'होममेड टच' देत बसली. मस्त झाले होते पोहे. आटपुन तिकडून निघालो आणि 'मुछाला महावीर'कडे निघालो. आज फ़क्त ३ किमी. ट्रेककरून आमचा प्रवास संपणार होता. तेंव्हा घाई तशी नव्हतीच. वाट सुद्धा सपाट होती. जंगल विरळ होत चाललेले स्पष्ट दिसत होते. तासाभरात ट्रेक संपवून बाहेर पडलो आणि 'मुछाला महावीर'कडे मोर्चा वळवला. हे एक जैनमंदीर आहे. मार्बलवरील अतिशय सुंदर कारागिरी येथे बघायला मिळते. दर्शन घेउन तिकडून बाहेर पडलो तर बाजुला एक जलजीरा वाला उभा होता. मग काय म्हटले होउन जाऊ दे एक-एक ग्लास लिंबूपाणी. तिकडून निघालो ते थेट ट्रकमध्ये बसून पुन्हा बेसकैंपकडे. ४५ मिं.मध्ये रणकपुरला पोचलो. निघायच्या आधी मस्त पैकी जेवलो. भाटीकडून ट्रेक पूर्ण केल्याची सरटिफिकेट्स घेतली आणि फालना स्टेशनकडे निघालो. इथ पर्यंत आलोच आहोत तर जाता-जाता 'माउंट आबू' बघून जाऊ असा प्लान केला होता. फालनाला पोचलो त्या दिवशी १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन होता. ऐश्वर्या आमच्यात सर्वात लहान मग तिचा खोटा-खोटा वाढदिवस साजरा करायचा कीडा डोक्यात आला. दिपक आणि संजूला खादाडीचे सामान आणायला पाठवले. ते दहीकचोरी, समोसे, कांदाभजी असा भरगच्च मेनू घेउन आले. अनुजा स्टेशनवर हातगाडीवाल्याकडून ऐश्वर्याला गिफ्ट म्हणुन एक छोटासा आवाज करणारा ससा घेउन आली. मग स्टेशन वरतीच तिचा वाढदिवस सेलेब्रेट केला. सोलिड मज्जा आली. त्यानंतर गाडी यायच्या आत खादाडी पूर्ण केली. दिपक आमच्याबरोबर येणार नव्हता. तो थेट घरी जाणार होता. त्याला टाटा केले आणि आम्ही आबूला जायला निघालो. तासाभरात आबूरोडला पोचलो.


स्टेशनला पोचल्या-पोचल्या थेट धाव मारली ती रबडीच्या स्टालकडे. दही-दुधाचे प्रकार न आवडणाऱ्या अभ्याने सुद्धा मस्त आडवा हात मारला. उभे-आडवे हात मारल्यावर तिकडून बाहेर पडलो, एक जीप भाड्याने घेतली आणि थेट पोचलो माउंट आबूला. तिकडच्या YHAI होस्टेलला पोचायला ज़रा उशीर झाला तर आम्ही सांगून ठेवलेल्या रूम्स त्यांनी दुसऱ्या कोणाला देऊन टाकल्या होत्या. चायला... मग मिळेल त्या कुठल्याश्या एका खोलीत आम्ही सेट झालो. ८ वाजत आले होते. संध्याकाळच्या खादाडीसाठी बाहेर पडलो. नॉन-व्हेज मिळते का कुठे ते बघत बघत एक चाटवाला सापडला. मग होटेलसाठी पुढची शोध मोहिम होईस्तोवर पोटात काहीतरी असावे असे सर्वांचे संगनमत ठरले. त्या चाटवाल्याबरोबर बोलता-बोलता कळले की तो आधी पुण्याला होता. मुंबई-पुण्याकडच्या लोकांना चाट कशी लागते तशी बनवून दिली एकदम त्याने. व्यवस्थित मराठी येत होते त्याला. नंतर शेजारी असणाऱ्या एका होटेल मध्ये गेलो. नॉन-व्हेज होते पण बकवास... टेस्टची टोटल वाट लागली. इकडे गेल्यावर व्हेजच खावे हेच खरे. पोट भरले होते तरीपण मार्केटमधून आइसक्रीम खाऊन आलो. आज रात्री मात्र 'नो घोरायण'. सर्व कसे शांत-शांत वाटत होते. मला तर बराच वेळ झोप लागेला.. घोराख्यान मिस करतोय की काय असे वाटत होते. अखेर झोप लागली.
सकाळी उठलो आणि आवरून घेतले. आज अर्ध्या दिवसात माउंट आबू मधल्या काही महत्वाच्या जागा बघायच्या होत्या. आम्ही फिरायला एक गाडी केली अणि 'महादेव मंदिर'कडे प्रस्थान केले. तिकडे पोचलो तर बाहेरच एकजण डालिंब घेउन बसला होता. मी आणि ऐश्वर्याने अभिकडे (आमचा खजिनदार...) 'घे.. ना..' ह्या अर्थाने पाहिले. झाली सुरू आजची खादाडी. तिकडून मग ब्रम्हकुमारी मंदिरावरुन पुढे जात 'गुरुशिखर'ला पोचलो. हे राजस्थानमधले सर्वात उंच शिखर आहे. बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी जाते. मग पुढे चढून जावे लागते. पण फारवेळ नाही लागत. शिवाय वाटेवर खायची दुकाने आहेतच. तेंव्हा.....!!!  माथ्यावर गुहेमध्ये दत्तात्रयांचे मंदीर आहे. तिकडे दर्शन घेउन खाली उतरलो. सकाळभरात काही जागा बघून आम्ही 'दिलवाडा मंदिर' बघायला पोचलो. आत तशी गर्दी होती म्हणुन आधी जेवून घ्यायचे ठरले. आजूबाजुला आपल्याला हवे तसे काही धड मिळेल असे वाटत नव्हते. तरी एका होटेलमध्ये गेलो. त्याच्याकडे डोसा, सांबर, थाळी असे प्रकार होते. मग थोड़ा आडवा हात मारून घेतला. तुम्ही कधी माउंटआबूला गेलात तर 'दिलवाडा मंदिर' न बघता येऊ नाका. येथले सर्वात मोठे प्रेक्षणीय स्थळ आहे हे. अतिशय सुंदर कलाकुसर केलेले जैन मंदीर हे ११ व्या शतकात बांधले गेलेले आहे. आतमध्ये एकुण ५ मंदिरे आहेत. आपण आत गेलो की २०-२५ जणांच्या ग्रुपला एक असा माहितिगार देतात. अर्थात तो थोड़ेफार पैसे मागतो पण माहिती मस्त देतो. इकडून मग आम्ही 'अचलगढ़'ला गेलो. हा किल्ला सुद्धा राजा कुंभा यांनी बांधलेला आहे. पण माथ्यावर फार काही राहिलेले नाही. अनुजा आणि संजू तर वरती आलेच नाहीत. खालती खरेदी करत बसले. मी, अभि, मनाली आणि ऐश्वर्या वरती जाउन भटकून आलो. ४ वाजत आले होते. तेंव्हा आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.


संध्याकाळी निघायच्या आधी मार्केटशेजारी 'नक्की लेक'ला जायचे होतेच. हां तलाव म्हणे कामगारांनी कुठलीही यंत्र न वापरता हाताच्या नखांनी खोदून बनवला आहे. म्हणुन याला नक्की लेक म्हणतात. संध्याकाळी लोकांची तुंबळ गर्दी होती इकडे. शनीवार होता न. त्या गर्दीत मनाली, ऐश्वर्या आणि अनुजा शिरल्या. खरेदीसाठी अवघा दिडतास हातात होता. त्यानंतर ट्रेन पकडायला गाडीने पुन्हा आबूरोडला पोचायचे होते. रात्री ८:३० वाजता सर्व लवाजम्यासकट आम्ही आबूरोडकडे प्रस्थान केले. गाडीमध्ये माणसे कमी आणि सामान जास्त होते. मी तर मागच्या सिटवर एक सामान होउनच पडलो होतो. गोल-गोल फिरत खाली उतरणाऱ्या त्या रस्त्यामुळे चक्कर येत होती. वर आमचा ड्रायव्हर बहुदा एक्स-फोर्मुला-१ होता बहुदा... ९:३० वाजता त्याने आम्हाला स्टेशनला सोडले. नशीब 'पोचवले' नाही. ट्रेन यायला अजून २ तास होते. मग पुन्हा एकदा होटेलचा शोध सुरू झाला. स्टेशन बाहेरच्या रबडी वाल्याकडून २ किलो. रबडी विकत घेतली आणि होटेलची माहिती सुद्धा. ह्या होटेलमध्ये मात्र डोसा चांगला मिळाला. मी, अनुजा आणि ऐश्वर्या खाऊन आलो तर अभि, मनाली आणि संजूसाठी पार्सल घेउन आलो. रात्री ट्रेन येईपर्यंत स्टेशनला पकलो होतो. अखेर एकदाची ट्रेन आली आणि आम्ही पकायचे थांबलो. ट्रेनमध्ये गेल्यावर सरळ आडवे झालो. सकाळी जाग आली तर अभी ट्रेकचा हिशोब करत बसला होता. मनाली त्याला आकडे सांगत होती. अनुजा ऐश्वर्याने नुकतीच विकत घेतलेली मोसंबी सोलत बसली होती आणि संजू फोनवर कोणाला तरी त्याचे संस्कृत पांडित्य ऐकवत होता. मी उठून बसलो... अर्धा झोपेत होतो पण अजून सुद्धा आठवत होते ते गेले ५ दिवस. ज्यात आम्ही खा..खा..खाल्ले आणि हुंदड..हुंदड..हुंदडलो. आवरून बसलो. सकाळी ८ वाजता बोरीवली यायच्या आधी आबू वरुन विकत घेतलेली २ किलो रबडी संपवायला विसरलो नाही आम्ही...!!!
.
.

Tuesday 2 February 2010

ट्रेक टू अरावली -'कुंभळगड़' मार्गे 'ठंडीबैरी' ... !

कालरात्री आमच्या 'एक्टिंग एपिसोड' नंतर सुद्धा आम्हाला थोडेसे 'घोरायण' ऐकावे लागले होतेच. ह्या ट्रेकमध्ये सकाळी खाणे आणि रात्री घोराख्यान ऐकणे हेच सुरू होते. गेल्या २ दिवसात रणकपूर मार्गे फूटादेवल आणि तिकडून कुंभळगड़ असा पल्ला आम्ही गाठला होता. आज सकाळी लवकरच निघायचे म्हणून आवरा-आवरी सुरू होती इतक्यात ग्रुपमधले एक काका शुजची जोड़ी घेउन आले. 'अरे ये शुज मेरे बैग मी शायद २ दिन से है. मेरे तो नहीं है. आपमेसे किसके है क्या?' २ दिवसापासून अभिचे गायब असलेले शुज कुठे गेले होते ते आम्हाला आत्ता समजले. ह्या काकाने स्वतःचे समजुन ते बैगमध्ये घातले होते आणि अभि आपला २ दिवस फ्लोटर्सवर ट्रेक करतोय. अखेर अभिच्या शुजची आणि पायाची भेट झाली. अभि मात्र वाटत असुनही त्या काकांना काही विशेष बोलला नाही. संजूने मात्र त्याचा ठेवणीतला शब्द वापरलाच. 'जड़ बुद्धि'च आहे हां. 'जड़ बुद्धि' हा संजूचा खास शब्द. संस्कृत शिक्षक असल्याने एखाद्या घडलेल्या गोष्टीवर मध्येच टिपणी म्हणुन एखादे सुभाषीत सुद्धा सोडायचा तो. कोणी काही मंदपणा केला की तो झाला जड़बुद्धि.


आज ट्रेकचा महत्वाचा दिवस होता. आम्ही निघालो आणि ८ वाजता कुंभळगड़चा पहिला दरवाजा 'हनुमान पोल' पार करून आत प्रवेश करते झालो. प्रवेश केल्या-केल्या समोर जे दिसले ते अतिभव्य होते. किमान १० माणसी उंच असा 'राम पोल' हा गडाचा दुसरा दरवाजा आणि त्याला संरक्षित करणारे त्याचे बुलंद भक्कम तट-बुरुज. अवर्णनीय आणि अप्रतिम असे ते दृश्य होते. डोळ्यात साठवलेले ते दृश्य मग कमेरा मध्ये सुद्धा साठवले. आम्हाला गड़ बघायला ३ तास दिले होते शिवसिंगने. मग सामान तिकडेच ठेवले आणि आम्ही त्या बुलंद किल्ल्यात प्रवेश करते झालो. 

कुंभळगड़ ---  राजा कुंभा यांनी १५व्या शतकात हां किल्ला बांधला. ह्या किल्याला ३६ किमी लांब तटबंदी आहे... होय..होय.. मी '३६' बोलतोय. ३.६ नाही... चीनच्या भिंतीनंतर जगातली ही सर्वात लांब सलग भिंत आहे. नव्हते ना माहीत.. तिकडे जाईपर्यंत आम्हाला सुद्धा माहीत नव्हते. ती संपूर्ण तटबंदी बघून ट्रेकचे सार्थक झाले एकदम. बालेकिल्यावरून ह्या संपूर्ण तटबंदीचे आणि त्यावर असणाऱ्या बुलंद बुरुजांचे दृश्य एकदम जबरदस्त दिसते. तटबंदी चांगली ६-८ मीटर रुंद आहे. शिवाय आतल्या बाजूने सुद्धा १० एक मीटर खोल. किल्यात उतरायला ठिकठिकाणाहून बांधीव वाटा आहेत. (यांना बहुदा आपल्याकडे फांजी म्हणतात.. आत्ता नक्की आठवत नाही) किल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला गणपतीचे मंदीर आहे. तिकडून पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. मार्ग म्हणजे प्रशत्र बरं का.. एकावेळी २ हत्ती जातील डुलत-डुलत जातील ईतका. तो सुद्धा अतिशय सुस्थितीत. दोन्ही बाजूला छानपैकी तांबडया रंगाच्या दगडांची तटबंदी आणि फुलांच्या बागा. आपण जस-जसे वर-वर जातो तसा उजव्या हाताला असणारा किल्ल्याचा प्रशत्र भाग दृष्टीक्षेपात येतो. किल्यात दुरवर असणारे 'जैनतीर्थ' हे या गडामधील सर्वात जून बांधकाम आहे. त्या अलीकडे निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर आहे. यात असणारी शिवपिंडी ५ फुट उंच आहे. राजा कुंभा म्हणे इतका उंच आणि भारदस्त होता की तो जमीनीवर बसून पिंडीवर अभिषेक करत असे. बाजुलाच प्रचंड मोठा सभामंडप आहे. एकामागुन एक दरवाजे पार करत आपण वर-वर जात असतो. मध्ये एकेठिकाणी 'भैरू का शीर' म्हणुन समाधीस्थळ आहे. शीर इकडे आणि त्याच्या भैरूचे धड मात्र वरती 'बदाम महल'मध्ये आहे. ह्या मागची कथा काही कळली नाही. ६ व्या दरवाज्यानंतर डाव्या हाताला एक वास्तू आहे. हे आहे 'महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ' ...  ७ व्या दरवाज्यानंतर मात्र रस्ता लहान होतो. इकडून बालेकिल्ला सुरू होतो. बालेकिल्ल्यावर 'बदाम महल' आहे. अर्थात राजनिवासस्थान. आजही संपूर्ण वास्तु नीट जपलेली आहे. महालाचा काही खाजगी भाग सोडला तर संपूर्ण महाल बघता येतो. मौर्य साम्राज्याच्या राजा संप्रती याचे दुसऱ्या शतकात येथे राज्य होते असे काही पुरावे आहेत. पण सध्या जे अतिभव्य रूप या किल्ल्याला आहे त्याचे संपूर्ण श्रेय राजा कुंभा यांचे आहे.



महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ ... 




निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर ...


अवघ्या ३ तासात सर्व किल्ला बघून ३६ किमी. तटबंदीवरुन फेरा मारणे अशक्य होते. तेंव्हा गडावरील सर्व महत्वाची स्थळे बघून आम्ही खाली परतलो संपूर्ण गड़ बघून झाल्यावर तिकडेच असणाऱ्या राजस्थान टुरिझमच्या होटेलमध्ये गेलो. किमान ओमलेट तरी मिळेल ह्या आशेने. आणि काय आश्चर्य... होते की तिकडे. मग आम्ही ३ दिवसांपासून सुरू असलेला आमचा 'नॉन-व्हेज उपवास' मोडीत काढला.ओमलेट नाश्ता झोडला आणि ११ वाजता आम्ही पुन्हा एकदा 'राम पोल'कडे परतलो. शिवसिग आमची वाट बघत होताच. "चलो चलो. आप सबसे पिछे हो. बाकी सब आगे निकल गये." आम्ही म्हटले,"जाने दो. जिसके लिए यहातक आये कमसे कम वो किला तो ढंग से देख लेते. आप चलो हम आते है." पुन्हा एकदा 'राम पोल'चे ते अतिभव्य दृश्य डोळे भरून बघून घेतले आणि पुढच्या वाटेला लागलो. आता खरंतरं आमचा परतीचा ट्रेक सुरू झाला होता. आज दुपारभरात १३ किमी.चे कुंभळगड़ जंगल पार करत 'ठंडीबैरी' या ठिकाणी असणाऱ्या कैंपसाइटला पोचायचे होते. कुंभळगड़ मागे टाकत आम्ही आता जंगलाच्या दिशेने निघालो. जस-जसे पुढे जात होतो तशी वाट उतरत होती. गडाचा बदाम महाल मात्र मागे अजून सुद्धा साद घालत होताच. आमच्या बराच वेळ आधी निघालेले पुढच्या ट्रेकर्सचे आवाज येऊ लागले होते. नंतर तर वाट एकदम खाली उतरायला लागली. बघतो तर काय... पुढे शिवसिंग पाठीवर ३ सॅक्स घेउन वाट उतरत होता. कोणा दोघा ट्रेकर्सनी (? ह्यांना ट्रेकर्स का म्हणावे???) त्यांचे सामान उचलत नाही म्हणुन शिवसिंग गाइडकडे दिले होते. ते २ कोण असणार हे सुद्धा आम्हाला ठावूक होते. शिवसिंगपर्यंत जाउन पोचलो आणि त्याला म्हणालो,"आपका बैग हमें देदो. थोड़ा सामान कम हो जाएगा" तो मात्र काही तयार झाला नाही. त्याला आणि इतर २ जणांना पार करत आम्ही वेगाने उतरु लागलो.


बघता-बघता अवघ्या २० मिनिट्समध्ये अनेक जणांना मागे टाकत खालच्या सपाटीला पोचलो सुद्धा. कुठे जाउन थांबायचे ते शिवसिंगला विचारून ठेवलेले होतेच. बोराची झाडे आणि शेजारी एक थंड पाण्याची विहीर होती. तिकडे जाउन टेकलो. शिवसिंग आणि मागुन येणाऱ्या काही लोकांकडून समजले की २-३ जण रस्ता चुकले. मग शिवसिंग, अभि आणि संजू पुन्हा त्यांना शोधायला मागे गेले. आम्ही तोपर्यंत जेवणाची तयारी केली. यथेच्छ पोटोबा केला आणि थोडा वेळ निवांत पडलो. अभि आणि मनाली बोराच्या झाड़ावर चढून बसले होते तर त्या झाड़ाखाली अनुजा ताणून देऊन चक्क झोपली होती. तिला जेवण चढले होते बहुदा. दिपक तर विहिरीच्या काठावर वामकुक्षी घेत होता आणि संजू तोंडाला साबण लावून बसला होता. मी ह्या सर्वांचे फोटो काढत होतो. पण ऐश्वर्या कुठे होती??? बघतो तर दुसऱ्या एका बोराच्या झाड़ाखाली ही पोरगी बोरं खात बसली होती. आता काय बोलावे हेच समजेना... मला माझा मित्र विवेकचे वाक्य आठवले.

आपल्याला २ वेळाच भूक लागते. 'एकदा खाण्याआधी' आणि 'दुसरी खाण्यानंतर'... हे बहुदा ऐश्वर्याला तंतोतंत लागु पड़ते... 



ऐश्वर्या... बोरे.. 'आयमिन पुरे' ...

 

दिपक... ए... दिपक...

संस्कृतपंडित संजू...


तासभर झाल्यावर शिवसिंगने 'आगे बढो'चा इशारा दिला. ह्यावेळी मात्र आम्ही सर्वात पुढे सटकलो. रस्ता अगदी सरळ होता. चुकायचा प्रश्न नव्हता. आम्ही आज खाताना गप्पा कमी मारत होतो. जंगलातून जाताना आवाज जितका कमी कराल तितके वन्यजीव दिसायची शक्यता अधिक. थोड्याच वेळात बाजूच्या झाड़ीतून काहीतरी पळाले. बघतोय तर मोठी जंगली कोंबडी होती. फोटो काढता येइल इतका अवसर मात्र तिने काही दिला नाही. आमच्यात सर्वात पुढे दिपक होता. त्याला स्पष्टपणे आणि मला ओझरते रानडुक्कर दिसले. चाहुल लागल्या-लागल्या ते पसार झाले. नंतर काही दिसले नाही. अगदी माकडे सुद्धा नाही. पक्षी साद घालायचे मात्र दर्शन द्यायचे नाहीत. आज आमचा चालायचा वेग जोरात होता. एकतर वाट सरळ आणि जंगलातील होती. ४ च्या सुमारास कुंभळगड़च्या जंगलातून बाहेर पडून ठंडीबैरी गावाकडे पोचलो. छोटेसे गाव होते एकदम. गावाच्या थोडेच पुढे राजस्थान वनखात्याचे गेस्टहाउस आहे. तिकडे जाउन पोचलो. गेस्टहाउस मध्ये २ मोठी खोली आणि एक लहान खोली होती. लहान खोलीत २ बेड सुद्धा होते. ते अर्थात मुलींनी पटकावले. आम्ही मोठ्या खोलीत जमीनीवर अंथरुण घालून सामान सेट करून टाकले. आज बाहेर झोपणे शक्य नसल्याने त्या खोलीत 'घोरायण' ऐकावे लागणार होते. संध्याकाळ झाली तसे आम्ही आसपास भटकायला बाहेर पडलो. जास्त लांब जाऊ नका असे आम्हाला सांगितले होते. जवळच एक तलाव होता तिकडे गेलो आणि अंधार पड़ेपर्यंत परत आलो. मध्ये-मध्ये मोरांचे आवाज ऐकायला यायचे पण दिसत नव्हते कुठे. आज ट्रेकची शेवटची रात्र होती. उदया सकाळी इकडून निघून मुछाला महावीर बघून पुन्हा रणकपूरला पोचायचे होते. तेंव्हा आजचा डिनर ख़ास राजस्थानी होता. 'दाल-बाटी-चोरमा' ... बाटी थोड़ी कड़क झाली होती पण मग एकदाच सर्व फोडून घेतल्या आणि मग नरम होण्यासाठी दाल मध्ये बुडवून ठेवल्या. तेवढ्या वेळात आपला 'चोरमा' खाणे सुरू होतेच. त्यानंतर पुन्हा दाल-बाटी. चांगले ४५ मिनिटे जेवण झाले. जेवण झाल्यावर ९ वाजता गेस्ट हाउसच्या गच्चीवर जाउन बसलो. इतर कोणी कैंपफायर करायला नव्हतेच. तेंव्हा मग पुन्हा 'लाफ्टर चैलेंज राजू' सुरू झाले. काही वेळाने अभिला डोंगरामागून उजेड येताना दिसला. आम्हाला आधी वाटते की कुंभळगड़च्या लाइट्सचा प्रकाश इथपर्यंत येतोय की काय.पण नाही लाईट डोंगरातून वर आला तेंव्हा कळले की तो तर चंद्र होता. आम्ही गप्पा टाकत बसलो होतो तोच त्या गेस्टहाउसचा एक माणूस आला. गच्ची बंद करायची आहे असे सांगून उगाच आम्हाला खाली पाठवून दिले. कैंपलीडर आम्हाला कैंपफायर सुद्धा करू देईना. मग अभि भडकला आणि जाउन भाटीला बडबडला. YHAI नॅशनल ट्रेक्समध्ये कसे कैंपफायर केले जाते, कैंपलीडर सर्वांना कसा त्यासाठी तयार करतो वगैरे-वगैरे. गच्चीवर नाही तर गेस्टहाउसच्या बाहेरच आम्ही १०:३० पर्यंत गप्पा मारत बसलो आणि मग झोपायला गेलो. सर्वजण झोपले होते पण मुलांच्या खोलीत दुसऱ्या दिवशीचे सामान लावत आम्ही चौघे दंगा करत बसलो होतो. शेजारी घोरायण सुरू झाले होते. संजू मध्येच जोरात ओरडायचा की सर्व शांत व्हायचे आणि पुन्हा काही सेकंदात सुरू... मी आणि दिपक हसून हसून वेडे झालो होतो. दिपक जास्त हसला की मी 'राजू'च्या स्टाइलमध्ये दिपक.. ए.. दिपक... असे बोलायचो की मग संजू फुटायचा.. अभि मात्र 'चायला गप्प बसा रे' आता असे बोलायचा मध्येच. स्वतःला कितीही त्रास झाला तरी लोकांना त्रास होऊ नये ह्यासाठी अभि सदैव तत्पर... पण मी मात्र जे लोक आम्हास त्रास देतील त्यांस आम्ही कसे ते सोडावे??? ह्या वृत्तीचा... रात्री बऱ्याच उशिराने आम्ही गुडुप झालो. उदया सकाळी-सकाळी निघून परतीच्या मार्गाला लागायचे होते... आणि मग तिथून 'माउंट आबू'ला जायचे बाकी होतेच की...
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - 'माउंट अबू'कडे प्रयाण ... !
.
.