Thursday 8 October 2009

लडाखचा सफरनामा - १५ ऑगस्ट ... 'लेह'मधील ... !


स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाने कालचा थकवा आणि शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. कालच्या दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री उशिराने झोपून देखील सर्वजण ७:३० वाजता निघायला हजर होते. हलकासा नाश्ता केला आणि पोलो ग्राउंडकडे निघालो. लेह मार्केटच्या थोड वरच्या बाजूला आहे हे पोलो ग्राउंड. फार मोठे नाही आहे पण ह्या सोहळ्यासाठी पुरेसे असे आहे. जम्मू-काश्मिरप्रमाणे इकडे परिस्थिति नसल्याने तशी फारशी सिक्युरिटी नव्हती. झेंडा वंदनासाठी विविध दलाचे, अनेक शाळा-कोलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रिय छात्र सेनेचे कडेट्स त्यांच्या बर्रेटवरच्या लाल हायकलमध्ये उठून दिसत होते. ह्या सर्वात 'महिला दले आणि छात्र सेनेच्या मुली' यांची संख्या लक्षणीय होती. नागरीकांची उपस्थिती सुद्धा खुप जास्त होती. मला खरच समाधान वाटले. श्रीनगर प्रमाणे इकडे वातावरण नाही. इकडे प्रत्येकाला लेह-लडाख हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे मनापासून वाटते.


आमच्या पैकी ज्यांच्याकडे SLR होते त्यांना जरा जवळून फोटो घेता यावेत म्हणुन नबी (गेस्टहाउसचे मालक) यांनी अमेय, उमेश आणि कुलदीप या तिघांना आत नेले. आम्ही बाकी सर्वजण जरा लांब उभे होतो. बरोबर ८:३० वाजता प्रमुख पाहूणे आले आणि त्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. 'जन गण मन'चे सुर घुमु लागले. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ ५२ से. आम्ही निश्चल उभे होतो. आम्हाला आज एक वेगळाच आनंद येत होता. नेहमीप्रमाणे घरी किंवा शाळा-कोलेजमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा न करता आम्ही एका निराळ्याच ठिकाणी तो साजरा करत होतो. झेंडावंदन झाल्यावर सर्व दलांनी राष्ट्रध्वजासमोरून संचलन केले. मला माझ्या कोलेजचे दिवस आठवत होते. असा एक १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी गेला नाही जेंव्हा मी घरी बसलो असेन. प्रत्येकवेळी कोलेजमध्ये तयारी करण्यात, मार्चिंगची प्राक्टिस करण्यात एक उत्साह असायचा अंगात. कोलेज संपल्यावर कामाला लागल्यापासून २ वर्षे ते सर्व काही चुकत होते. त्यामुळेच बहुदा आज एक निराळे समाधान मला लाभले.


या ठिकाणी आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो तो गेल्यावर्षी द्रास - कारगील - लेह या मोहिमेवर आलेल्या 'सलाम सैनिक'च्या टीमचा. अनुजा, ममता, अमित असे माझे काही जवळचे मित्र-मैत्रिणीं गेल्या वर्षी खास सैनिकांना भेटायला लेह-लडाखच्या बाइक ट्रिपवर आले होते. १५ ऑगस्ट आणि त्याला जोडून आलेली रक्षाबंधन असा मोहिमेचा दुहेरी हेतु होता. ह्या मोहिमेत जास्तीत जास्त सैनिकांना भेटणे, त्यांना घरी बनवून आणलेला खाऊ देणे, काही पुस्तकांचे वाटप करणे, नागरिकांनी सैनिकांसाठी लिहिलेली पत्रे त्यांना देणे अशी काही मुख्य उद्दिष्टे होती. टिममधल्या अनुजा आणि ममता यांनी सैनिकांना बांधण्यासाठी खुप साऱ्या राख्या सुद्धा नेल्या होत्या. या मोहिमेमध्ये मला सहभागी होता न आल्याने मी बराच अपसेट होतो. मला स्वतःला जात न आल्याने मी सुद्धा एक पत्र लिहून पाठवले होते. ते पत्र येथे देत आहे. आजच्या स्वातंत्रदिनी माझ्या भावना ह्यापेक्षा काही वेगळ्या नव्हत्या.


सैनिकहो तुमच्यासाठी ... !




स्वातंत्रोत्तर काळात गेल्या ६० वर्षात जेंव्हा-जेंव्हा शत्रुंनी सीमेवर यूद्धे छेडली, तेंव्हा-तेंव्हा आपण मोठ्या तत्परतेने मात्रुभूमीच्या रक्षणार्थ धावून गेलात. वारा-वादळे, उन-पाऊस, हिमवर्षाव आणि जगातल्या सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितिमध्ये पाय घट्ट रोवून उभे राहिलात. १९४८ च्या डोमेल पराक्रमापासून ते कारगिल युद्धापर्यंत आणि आत्तापर्यंत सुरु असलेल्या दहशदवाद विरोधातील सैनिकी जिद्दीला आणि अतुलनिय पराक्रमाला आमचा मानाचा त्रिवार मुजरा.


राष्ट्रभावनेच्या उद्दात्त हेतूने प्रेरित होउन, वैयक्तिक प्रश्नांना बगल देउन आपण या भुमीचे आधारस्तंभ बनता, तेंव्हा कुठे आमच्यासारखे तरुण आपणास निवांतपणे हे पत्र लिहू शकतात. या देशात आजही जिजाऊँसारख्या माता आपल्या शिवबांना सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत व शिवछत्रपतींसारखे पुत्र निर्माण करत आहेत. आपल्या प्रत्येकात आज सुद्धा शिवछत्रपतींचा एक अंश आहे आणि म्हणूनच आपली राष्ट्रभावना प्रचंड उच्च आहे.


युद्धसदृश्य किंवा युद्ध परिस्थितिमध्ये अनेक दिवस अन्न-पाण्याशिवाय राहून, शत्रूला हुलकावण्या देत, अंगावर प्रचंड वजन घेऊनसुद्धा काटक व चपळ राहून, एका दमात प्रचंड अंतरे पार करीत आपण यशस्वी होता. अखेरच्या टप्यात शत्रूच्या नरडीचा घोट घेत देशाचा झेंडा मोठया अभिमानात पर्वत शिखरावर रोवता, तेंव्हा आमचा उर अभिमानाने भरून येतो. आज शत्रू फक्त सीमेवरच नव्हे तर सर्वत्र आहे. त्यास शोधून परास्त करण्याचे कर्तव्य आमचे देखील आहे. आम्ही ते पार पाडू याची आपण खात्री बाळगावी.




सैनिक आणि आमच्यात दुवा म्हणून काम करणार्‍या 'सलाम सैनिक' च्या तरुण-तरुणींना सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा. कारण आज प्रत्येकजण सिमावर्तीभागात जाउन सैनिकांशी संपर्क साधू शकत नसला तरी अशा मोहिमांमुळे हे शक्य होत असते. माझ्या सैनिकांनो, इकडे प्रत्येकाला तुमची आठवण आहे. काळजी आहे. सर्वात मुख म्हणजे सार्थ अभिमान आहे. आपण या देशाचे खरे आधारस्तंभ आहात. आपणास मनापासून मनाचा मुजरा.


            भारत माता की जय ... !
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - फुलांनी बहरलेले लडाख ... !
.
.
.

4 comments:

  1. just speechless.....
    “सैनिकहो तुमच्यासाठी” वाचताना खरंच अभिमानाने ऊर भरून येतो......त्यावेळी तुम्हां सर्वांना 15 ऑगस्टला तिकडे असल्याचा किती सार्थ अभिमान वाटला असेल याची कल्पना आली..... आयुष्यात स्वातंत्र्यदिन अश्या ठिकाणी साजरा करण्याचा हा अनुभव परमोच्च नाही का??

    ReplyDelete
  2. अमृता .. त्या पत्रामागे एक छोटीशी स्टोरी आहे. अनुजा लिहेलाच बहुदा त्या बद्दल. :D आणि हो असा अनुभव खरच एक वेगळी अनुभूती देऊन जातो.

    ReplyDelete
  3. रोहन पत्र वाचताना मन हेलावून गेले, अभिमानाने भरून आले. सगळ्या सैनिकांना त्रिवार सलाम. तुमच्या जाण्याचे सार्थक झाले.

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...