Wednesday 7 October 2009

लडाखचा सफरनामा - १५००० फूटावरील पेंगॉँग-त्सो ... !


९:३० वाजत आले होते. आता अजून वेळ दडवून चालणार नव्हते. ११ वाजायच्या आत 'शैतान नाला' काहीही झाला तरी पार करणे गरजेचे होते. चांग-ला वरुन निघालो आणि पलिकडच्या 'त्सोलटोक' पोस्टकडे उतरलो. काय एक-एक नाव आहेत. उच्चार करून लिहिताना किती वेळ लागतोय मला!!! आता पुढचे लक्ष्य होते ४० की.मी पुढे असणारे 'तांगत्से'. 'त्से' म्हणजे गाव हे कळलेच असेल तुम्हाला. आधी आपण असेच खालत्से पाहिले आहे नाही का!!! ८०-९० च्या वेगाने आता त्या मोकळ्या रस्त्यावरुन आमच्या गाड्या भरधाव वेगाने दौड़त होत्या. उजव्या हाताला नदीचे पात्र, डाव्या हाताला मिनिटा-मिनिटाला रंग बदलणाऱ्या उंच डोंगरसरी आणि समोर दिसणारे निरभ्र मोकळे आकाश. क्षणाक्षणाला वाटायचे की येथेच थांबावे. थोडावेळ येथील निसर्गाचा आस्वाद घ्यावा. पण नाही. शैतान नाला डोक्यात शैतानासारखा नाचत होता. तो गाठेपर्यंत आता कोठेही थांबणे शक्य नव्हते. १०:४५ च्या आसपास 'तांगत्से'ला पोचतो न पोचतो तोच मागुन अजून काही बाइक्सचे आवाज येऊ लागले. काल पेट्रोल पंपवर भेटलेला पुण्याचा ग्रुप होता. सर्व गाड्या MH-12. त्यातले अर्धे पुढे निघून गेले तर काही मागे होते. तांगत्से चेकपोस्टला एंट्री केली आणि भरधाव वेगाने शैतान नाल्याकडे सरकलो. चांग-ला नंतरच्या संपूर्ण भागाला 'चुशूल घाटी' म्हणतात. येथे स्थित असणाऱ्या रेजिमेंटला 'चुशूल वॉर्रीअर्स' असे म्हणतात. सध्या येथे गढवाल रेजिमेंटची पोस्टिंग आहे. चांग-लापासून चीन सीमेपर्यंतची सर्व जबाबदारी चुशूल वॉर्रीअर्स कडे आहे.ज्यावेळी मी ह्या ठिकाणावरुन पास झालो तेंव्हा 'मेजर शैतानसिंह' (PVC) फायरिंग रेंज दिसली. आणि माझ्या मनात लोकसत्ता मध्ये वाचलेली एक बातमी आठवली. जी जागा मला आयुष्यात एकदा तरी बघायची होती आज त्या ठिकाणी मी आलो होतो. ती बातमी.. तो लेख.. जसाच्या तसा इकडे देतो आहे.


'चुशूल' हे नाव भारताच्या युद्धविषयक इतिहासात सदैव अभिमानाने घेतले जाईल असे...


सियाचेनजवळ रजांगला सीमेवर तांगत्से नामक चौकी आहे. त्या चौकीच्या हद्दीतलं हे ठिकाण. १९६२ च्या नोव्हेंबरमध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं, तेव्हा मेजर सैतानसिंहांची ११८ जवानांची तुकडी तिथं होती. १८ नोव्हेंबरचा तो दिवस होता. चिनी सैन्याच्या तुकडय़ा तांगत्से चौकीवर कब्जा मिळवून रजांगलच्या सीमा सुरक्षा चौकीकडेआक्रमण करायला लागल्या, तेव्हा याच सैतानसिंहानं आपल्या ११८ जवानांना, प्राणांचं बलिदान देण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत १३ व्या कुमाऊँ रेजिमेंटचे ते जवान पुढे सरकत होते. पण लांब पल्ल्याच्या तोफांचा वापर करत पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी सैनिकांपुढे त्यांचा टिकाव लागत नव्हता. अशातच एक गोळी सैतानसिंहांच्या दिशेनं आली आणि तिनं त्यांचा वेध घेतला. हरफुलसिंह नामक हवालदारानं ते पाहिलं आणि त्यांना उचलून मागच्या बाजूस नेण्याचा प्रयत्न केला. सैतानसिंहांनी त्याला रोखलं. त्यांनी त्याला तांगत्से चौकीच्या दिशेनं दारूगोळा आणण्यासाठी पिटाळलं आणि जखमी अवस्थेत झुंज सुरूच ठेवली.

हरफुलसिंह तांगत्सेला पोचला, ती चौकी आपण गमावली असल्याचं त्याच्या लक्षात आलं, तिथले सैनिक लेहकडे गेल्याचं त्याला कळलं. मेजर सैतानसिंहांना आपली गरज आहे याचं स्मरण होताच हरफुलसिंह माघारी फिरला. पण परत येईपर्यंत त्याला पाहावं लागलं ते धारातीर्थी पडलेलं सैतानसिंहांचं कलेवर. ते दिवस बर्फाच्या वादळाचे होते. युद्धबंदी झाल्यावर भारतीय सैन्यातील काही मंडळी तिथं पोचली तेव्हा बर्फाखाली गाडले गेलेले सैतानसिंहाचे आणि त्यांच्या ११६ साथीदारांचे मृतदेह त्यांना मिळाले. त्या सर्वावर अंत्यसंस्कार करून मंडळी परतली. ग्रीष्म ऋतु सुरू झाला, तसं बर्फ वितळायला लागलं. त्या चौकीवर पुन्हा एकदा भारतीय सैनिक गेले तेव्हा तिथे अनेक चिनी सैनिकांचे मृतदेह पडले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या मृतदेहांची मोजणी करण्यात आली, तेव्हा ११०० चिनी सैनिकांना मरणाला सामोरं जावं लागलं असल्याचं निष्पन्न झालं. मेजर सैतानसिंहांचा तो पराक्रम पुढल्या वर्षी ‘परमवीर चक्रा’चा मानकरी ठरला.

मेजर सैतानसिंहाची ही आठवण आजही तिथं अभिमानानं सांगितली जाते. सैतानसिंहाचा आत्मा आजही त्या चौकीच्या आसपास फिरत असतो अशी समजूत आहे. आणि त्यामुळेच त्याचा गणवेश, त्याचं सामान, त्याच्या वापरातील वस्तू आजही त्याच्या सहकाऱ्यांनी जशाच्या तशा जपून ठेवल्या आहेत. त्याचा पगार म्हणे आजही त्याच्या नातेवाईकांना पूर्वीसारखाच दिला जातो. त्या युद्धात सैतानसिंह मेजर होता. युद्धात धारातीर्थी पडतानाही त्याचा हुद्दा तोच होता. आता बढत्या मिळत मिळत तो ब्रिगेडियरच्या हुद्याला जाऊन पोचला आहे. अन्य सैन्याधिकाऱ्यांप्रमाणेच त्यालाही तंबू आहे. त्याच्या सेवेत सैनिक आहेत. त्याच्या वाहनावर आजही चालकाची नियुक्ती आहे. तो सुटीवर जायला निघतो तेव्हा त्याचं अंथरुण-पांघरुण, सामान घेऊन एक सैनिक त्याला जवळच्या रेल्वे स्थानकावर सोडायला जीप घेऊन निघतो. सुटी संपायचा दिवस येतो तसं त्याला आणण्यासाठी जीप रेल्वे स्थानकावर जाते, जीपमध्ये कुणीतरी बसलं आहे अशा थाटात त्याचे सहकारी ती जीप घेऊन परत येतात. सैतानसिंहाच्या निवृत्तीच्या दिवसापर्यंत हा प्रकार असाच सुरू होता. आता बहुधा तो थांबला आहे. पण हे सारं वाचायला मिळालं ते ‘जम्मू काश्मीरचा सफरनामा’ या श्रीकांत जोशी लिखित पुस्तकात. (पृष्ठ क्र. ७२ आणि १०१ वर)



चुशूल ग्लेशिअरमधून वाहून येणाऱ्या त्या प्रवाहाला म्हणजे नाल्याला 'मेजर शैतानसिंह' यांचे नाव दिले गेले आहे. तिकडे पोचलो तेंव्हा ११:३० वाजले होते आणि शैतान नाला हा काय भयाण प्रकार आहे ते समोर दिसत होते. हा तर रस्तामध्ये घुसलेला नाला होता. नाही नाही.. दगडगोटयानी भरलेला उतरत नाल्यापलिकडे जाणारा रस्ता...!!! नाल्यामध्ये चांगले फुट दिडफुट पाणी वाहत होते. बाइकवरुन हा पार करायचा??? शक्य होते. आमच्यासमोर पुण्याचा ग्रुप नाल्यामध्ये बाइक्स टाकू लागला होता. आम्ही अंदाज लावला. १२ वाजत आले आहेत म्हणजे आता ग्लेशिअरमधून वाहुन येणाऱ्या पाण्याची पातळी पुढच्या २-३ तासात नक्की वाढणार आहे. आत्ता गाड्या टाकल्या तरी परत येताना त्या काढता आल्या नाहीत तर ??? लटकलो ना... आता कळले सकाळच्या ४५ मिं. चे महत्त्व. आम्ही जरा तासभर लवकर येथे पोचलो असतो तर बाइक्स घेउन अजून ४ की.मी पुढे पेंगॉँग-त्सो पर्यंत जाता आले असते. आता मात्र बाइक्स एकडेच ठेवणे भाग होते. आर्मीचा एक ट्रक होता त्यात बसलो आणि शेवटचे ४ की.मी. त्या ट्रकने प्रवास करून 'पेंगॉँग-त्सो' पर्यंत पोचलो. असा प्रवास मी जन्मात कधी केलेला नाही ना कधी करेन. एक-न-एक हाड निखळून पडते आहे की काय असे वाटत होते.





पुण्याच्या बायकर्सनी शैतान नाला पार करताना मनालीने घेतलेली एक छोटीशी क्लिप येथे आहे. तर कुलदीपने घेतलेला शैतान नाल्याचा हा एक जबरदस्त फोटो. फोटो बघून तुम्हाला कल्पना येइल की हे काय प्रकरण होत ते.



'पेंगॉँग-त्सो'ला पोचलो तेंव्हा दिवसाभराचे पडलेले सर्व कष्ट विसरलो होतो. अगदी हे सुद्धा की आम्ही पहाटे ५ नंतर काहीही खाल्लेले नाही आहे. पेंगॉँग-त्सो - वर्णन करता येणार नाही असे सौंदर्य. जिथपर्यंत आपली नजर जाईल तितक्या दूर-दूर पर्यंत केवळ निळेशार पाणी. त्या पाण्याला सिमा घालायची हिम्मत फक्त त्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये. अवर्णनातीत असे पांढरेशुभ्र सुंदर आकाश आणि त्या आकाशाचे पाण्यात दिसणारे प्रतिबिंब. खरे सांगायचे तर माझ्याकडे अजून शब्दच नाहीत ते सौंदर्य तुमच्या समोर मांडायला. २ फोटो टाकले आहेत ते बघा म्हणजे कळेल काय सौंदर्य होते ते. पेंगॉँग-त्सो हा भारत चीन सीमेवर आहे. ६० टक्के चीनमध्ये तर ४० टक्के भारतात आणि गंमत म्हणजे हा तलाव खाऱ्या पाण्याचा आहे. हिवाळ्यात जोरदार हिमवर्षाव सुरू झाला की हा संपूर्ण तलाव गोठतो. इकडच्या उन्हाळ्याच्या सुरवातीला बर्फ वितळून शैतान नाला रौद्ररूप धारण करतो. ह्या संपूर्ण वेळात इकडे कोणीही जा-ये करू शकत नाही. जून नंतर थोडे फार पलीकडे जाता येते. आम्ही सर्वांनी तिकडे खुप-खुप फोटो घेतले.







इकडे थांबायला खुपच कमी वेळ मिळाला होता. फार तर १५-२० मिं. आम्हाला घेउन आलेला ट्रक परत जाउन पुढच्या लोकांना इकडे आणणार होता त्यामुळे आम्हाला आता निघावे लागणार होते. मन मारून ट्रकमध्ये बसलो आणि इकडे लवकरच पुन्हा येणार असे नक्की केले. फक्त येणार नाही तर इकडे किमान १ दिवस राहणार. पुण्याचा ग्रुप आज इकडे राहणार असल्याने त्यांनी बाइक्स पलीकडे आणल्या होत्या. त्या ट्रकमधून पुन्हा एकदा शैतान नाल्यासमीप पोचलो. त्या ४०-४५ मिं. मध्ये प्रवाह वाढलेला जाणवत होता. बरं झाला बाइक्स पाण्यात नाही टाकल्या ते. बाइक्स ताब्यात घेतल्या आणि परतीच्या प्रवासाला निघालो. दुपारचे २ वाजत आले होते आणि आता सर्वांना भूका लागल्या होत्या.



एके ठिकाणी होटेलचा तंबू लावलेला दिसला. त्याच्या कडे फक्त मॅगी होते. त्याला म्हटले आण बाबा जे काय आहे ते. काहीतरी जाऊदे पोटात. आधी चांग-ला आणि मग शैतान नाला दोघांनी चांगलीच वाट लावली होती. थोड़ा थकवा जाणवत होता. आता बायकर्स चेंज केले आणि ३ च्या आसपास आम्ही निघालो पुन्हा एकदा लेहकडे. इकडे साधना आणि उमेशने आम्हा काही जणांचे लडाख मोहिमे संदर्भातले बाइट्स घेतले. तांगत्से, त्सोलटोक ह्या भागातले नदीचे पात्र वाढलेले कळत होते. मध्ये रस्त्याचे काम सुरू असल्याने थोड़ा वेळ वाया गेला. मध्येच एके ठिकाणी एक मोठा प्रस्तर लागला. त्याचा आकार बेडकासारखा होता. बायकर्स पुढे निघून गेले होते आणि मी आता गाडीमध्ये होतो. परतीच्या मार्गावर कुठेही न थांबता आम्ही पुन्हा एकदा 'चांग-ला'ला पोचलो तेंव्हा ६ वाजत आले होते. तिकडे पुन्हा हरप्रीत सिंग बरोबर परत थोड्या गप्पा मारल्या. शक्तिला पोचायला अजून २१ की.मी.चा घाट उतरून जायचे होते. त्या उतारावर बायकर्स तर सुसाटच पण आमचा गाडीवाला पण भन्नाट सुसाट मध्ये गाडी उतरवत होता. शक्ती - कारू पार करत ८:३० वाजता लेहमध्ये पोचलो. दिवसाभरात काय खाल्ले होते? २ चहा आणि १-२ मॅगी बास...!!!



तेंव्हा ज़रा ठिक जेवुया म्हणुन पुन्हा एकदा ड्रीमलैंडला गेलो. बटर चिकन, चीज-गार्लिक नान आणि सोबत जीरा राईस असे तब्येतीत जेवलो. ११ च्या आसपास पुन्हा गेस्ट हाउसला आलो तेंव्हा अंगात त्राण नव्हते. झोपायच्या आधी मीटिंग मात्र झाली. अभीने मात्र सर्वांची खरडपट्टी काढली. सकाळी झालेल्या थोड्या उशिरामुळे पेंगोंगला जास्त वेळ देता आला नव्हता म्हणुन तो बराच अपसेट होता. ५-६ तास बाइक वरुन इतके अंतर पार करून गेलो आणि भोज्जा करून परत आलो असे काहीसे आज झाले होते. खरच आम्ही अजून लवकर निघायला हवे होते. पण जे झाले ते झाले आता पुढे ही काळजी घ्यावी लागेल हे मात्र नक्की होते. १२ वाजून गेले होते आणि सुरू झाला होता १५ ऑगस्ट. भारताचा स्वतंत्रता दिवस. उदया लवकर उठून आम्हाला लेहच्या पोलो ग्राउंडला परेड बघायला जायचे होते. तेंव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत निद्रेच्या अधीन झालो.
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - १५ ऑगस्ट ... !
.
.
.

10 comments:

  1. faarach sahi :)
    Shaitan singh yanchi goshta mi pan aikli hoti aani ajunahi te hayaat aslyasarakhach sagle vagtaat he pan aikla hota...

    aani tujhe te Pangong-tse che photo baghunach, ya jagi 1 da tari jaychach asa mi tharvun takla hota :) baghu kasa jamtay

    ReplyDelete
  2. रोहन
    प्रत्येक पोस्ट एक वेगळाच अनुभव देते आहे. खुपच सुंदर झालंय पोस्ट . इंडो चायना बॉर्डर मी भुतान मधे बघितली आहे. कलकत्त्याला पोस्टिंग असतांना मी बरेचदा भुतान -चायना बॉर्डरवर जायचो.. जुने दिवस ( २०-२२ वर्षापुर्विचे) आठवले . पण हे लडाख अजुनही राहिलंय .मनापासुन इच्छा आहे जायची.बघु या कसं जमतं ते.माझा एक मित्र आहे दिल्ली ला तो बघतो हा भाग. कधिचा म्हणतोय की एकदा जाउन ये म्हणुन तिकडे बघु या कसं जमतं ते...

    ReplyDelete
  3. रोहन
    प्रत्येक पोस्ट एक वेगळाच अनुभव देते आहे. खुपच सुंदर झालंय पोस्ट . इंडो चायना बॉर्डर मी भुतान मधे बघितली आहे. कलकत्त्याला पोस्टिंग असतांना मी बरेचदा भुतान -चायना बॉर्डरवर जायचो.. जुने दिवस ( २०-२२ वर्षापुर्विचे) आठवले . पण हे लडाख अजुनही राहिलंय .मनापासुन इच्छा आहे जायची.बघु या कसं जमतं ते.माझा एक मित्र आहे दिल्ली ला तो बघतो हा भाग. कधिचा म्हणतोय की एकदा जाउन ये म्हणुन तिकडे बघु या कसं जमतं ते...

    whenever i am trying to post with Wordpress id, the message is not being posted. every time the error comes, hence i am posting with Blogger id.. You may like to check the issue..

    ReplyDelete
  4. पूनम ... येत्या जून-जुलैमध्ये जायचा प्लान करा... शुभश्य शिघ्रम ... :D

    दादा ... खरच जाउन ये एकदा तरी. मी पुन्हा जाणार आहे १-२ वर्षात. :D शिवाय माझी पुढची मोहिम सिक्किम - भुतानची चायना बॉर्डर असणार आहे ... :D

    ReplyDelete
  5. सिक्किम, भुतान, नागालॅंड , अरुणाचल झालंय माझं , मी जेंव्हा सर्व्हिस इंजिनिअर होतो तेंव्हा जावं लागायचं . एक वर्षं कलकत्याला होतो, तेंव्हा जायचो.

    ReplyDelete
  6. मस्तच .. हे सर्व फिरायचे आहे मला आणि ते सुद्धा बाइक वर... :)

    ReplyDelete
  7. कधी जाशील रोहन दादा मला पण सांग... मी पण येइन.. तुम्हाला चालेल तरच हां ??

    बाकि वर्णन तर खुपच छान आहे.. पेंगोंग-त्सो च फोटो मी डेस्कटॉप पिक म्हणुन लावलाय...

    ReplyDelete
  8. रोहन. . . पेंगॉँग-त्सो चे फोटो तर निव्वळ अप्रतिम आहेत. . स्पीचलेस. . फूल टू धमाल आली असेल ना???

    ReplyDelete
  9. होय रे ... खरे तरं वर्णन करायला शब्दच नाहीत माझ्याकडे... जाउन अनुभव घ्यायला हवा एकदा... :)

    ReplyDelete
  10. मेजर सैतानसिंह यांचा पराक्रम खरच गोठवून टाकणारा आहे....118 v/s 1100!!!! Really hats off !!!!
    “पेंगॉँग-त्सो” चं सौंदर्य खरंच वर्णानातीत आहे.....तो फोटो तर एकदम झक्कास घेतलाय...... खार्‍या पाण्याचा एवढा मोठा तलाव म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा!!!! मला तो फोटो पाहिल्यावर आपल्याला पु. ल. देशपांडे यांचा एक धडा होता “निळाई” त्यामध्ये केलेलं वर्णन आठवलं.....
    अभिचे चांगलेच patience try केलेत तुम्ही सर्वांनी......एवढं सगळं coordinate करणं म्हणजे just gr8…..

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...