Friday 27 November 2009

लडाखचा सफरनामा - त्सो-कार - पांगच्या वाळवंटात ... !




पहाटे-पहाटे खोलीच्या छतामधून बारीक माती पडू लागल्याने मला आणि अभिला जाग आली. काय होतय ते समजतच नव्हते. नंतर कळले की छपरावार कोणीतरी नाचत असल्यामुळे असे होत आहे. ते कोणीतरी म्हणजे अमेय साळवी, अमेय म्हात्रे  आणि कुलदीप होते हे नंतर कळले. पहाटे-पहाटे फोटो काढायला हे तिघे छपरावार चढले होते. मला जाग आल्यावर मी इतर सर्वांना जाग आणली हे वेगळे सांगायला नकोच. ७ वाजता चहा घेउन आम्ही निघायची तयारी करू लागलो. पण पूनम काही सापडेना. कुठे गेली होती काय माहीत? नंतर ह्या तिघांचे अजून उपद्व्याप समजले. पूनम सुद्धा छतावर चढल्यानंतर ह्यांनी खालची शिडीच काढून घेतली होती. १५-२० मिं. वरतीच बसून होती. आरडा-ओरडा करत होती. शेवटी तिला खाली घेतले आणि ८ वाजता आम्ही सरचूच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी त्सो-मोरिरीचे सौंदर्य कालच्यापेक्षा वेगळे भासत होते. कालच्या कच्च्या रस्त्याने पुन्हा त्सो-मोरिरीला वळसा मारत आम्ही वाळूच्या पठाराकडे निघालो. वाळू कालपेक्षा जास्त भुसभूशीत जाणवत होती. आमच्या बाईकचा स्पीड फारतर तासाला २० किमी. इतका सुद्धा नव्हता. तेनसिंगला मात्र त्या कच्च्या रस्त्यावरून निघायची भलतीच घाई झाली होती बहुदा. अखेर त्याने चुक केलीच. वाळूच्या त्या रस्त्यात त्याने गाड़ी भलत्याच चिकिच्या बाजूने नेली आणि ...सामानाच्या वजनाने ती अख्खी गाड़ी वाळूमध्ये बसली. त्यात तेनसिंगने गाड़ी काढ़ण्यासाठी ती अजून रेस केली. आता तर ती अक्षरशः रुतली. मागुन येणाऱ्या बायकर्सना ह्याची काही कल्पनाच नव्हती. 'बाजुच्या दुसऱ्या रस्त्याने पुढे या' असे सांगायला दिपाली आम्हाला हातवारे करत होती. अभीला काही ते कळले नाहीत आणि तो पण त्याच रस्त्याने पुढे शिरला. आता त्याची बाईक सुद्धा वाळूत फसली. मग मात्र बाकी आम्ही सर्वजण उजव्या हाताने पुढे गेलो. बघतो तर.. गाड़ी अख्खी बसलेली. पुन्हा एकदा सर्व सामान उतरवले आणि मग 'इरादा पक्का तर दे धक्का' सुरू झाले. आजुबाजुने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे ड्रायव्हर सुद्धा आमच्या मदतीला आले.अखेर अखेरचा 'दे धक्का' करून गाड़ी चांगल्या रोडला आणली.




त्यानंतर आमची हालत काय झाली होती ते खालच्या फोटोंवरुन समजेल. सकाळी ८ वाजता सुद्धा तिकडे असे सणसणीत ऊन होते की चांगलीच धाप लागली होती. पाणी प्यालो.. ताजेतवाने झालो आणि मग पुढे निघालो. चांगला १ तास वाया गेला होता.













आता लवकरात लवकर त्सो-कार मार्गे पांग गाठणे महत्वाचे होते कारण तिकडून पुढे आम्ही दुसरी गाडी केली होती. तेनसिंगला पुन्हा आज लेहला पोचायचे असल्याने तो आम्हाला १२ च्या आत सोडणार होता. पुन्हा एकदा वाळूचे पठार पार करत पक्या रस्त्याला लागलो आणि वेगाने 'सुमधो'कडे निघालो. १० वाजून गेले तेंव्हा फाट्यापाशी आलो. इकडून डाव्या हाताने 'त्सो-कार'कडे निघालो. इकडून पुढचा रस्ता चांगला असेल असे वाटले होते पण नाही; पुढचा रस्ता परत कच्चा आणि वाळूचा. बाईकचा स्पीड देखील २५-३० च्या पुढे नेता येत नव्हता. अशात रस्ता मध्येच खाली-वर जायचा तर कधी अचानकपणे उजवी-डावीकडे. अश्यावेळी मागच्याला बाईक वरुन इतरून चालत यावे लागायचे तर कधी-कधी रायडरला सुद्धा बाईक ढकलत पुढे न्यावी लागायची. ११:३० च्या आसपास अचानकपणे एके ठिकाणी मला गाडी काही कंट्रोल झाली नाही आणि मी-शमिका डाव्या बाजूला वाळूमध्ये धसकन पडलो. इतक्या सावकाश पडलो की कोणालाच काही लागले नाही पण कपड्यात सर्व ठिकाणी वाळू मात्र शिरली. गाडी चालवण्यात आजपर्यंत एकदा सुद्धा ब्रेक न घेतलेल्या अमेय साळवीने त्याची बाईक आता उमेशकडे दिली होती. मी पडल्यावर काही मिंनिट्स मध्ये एका उजव्या चढावर उमेश आणि शोभीत सुद्धा वाळूमध्ये पडले. उमेशच्या हाताला आणि पोटाला मात्र थोड़ेसे लागले होते. सर्वजन तिकडेच थांबलो. ज़रा दम घेतला. 'बरेचदा अपघात परतीच्या प्रवासात होतात'  हे मला पक्के ठावुक होते. त्यामुळे 'ह्या पुढे गाडी अजून नीट चालवा रे' असे सर्वांना सांगून आम्ही पुढे निघालो. निघून ५ मिं. होत नाहीत तो आदित्य-ऐश्वर्याने पुढचा नंबर लावला. कुठूनसा एक कुत्रा भुंकत आला आणि दचकून आदित्यचा तोलच गेला.

त्सो-कारच्या त्या वाळवंटामध्ये अवघ्या १५ मिं मध्ये आम्ही एकामागुन एक असे आम्ही ३ बायकर्स धडपडलो होतो. नशिबाने कोणालाही जास्त लागले नव्हते. गाड्या सुद्धा शाबूत होत्या. कधी एकदाचा हा कच्चा रस्ता संपतोय आणि पक्क्या रस्त्याला लागतोय असे आम्हाला झाले होते. १२ वाजत आले तसे दुरवर त्सो-कार दिसायला लागले. सकाळी १ चहा घेउन निघलेलो आम्ही ह्या आशेवर होतो की किमान त्सो-कारला तरी काही खायला मिळेल. त्सो-कारला उजव्या बाजूने वळसा मारत पुढे निघालो. रस्ता ज़रा बरा होता म्हणुन सर्व बायकर्स वेगाने पुढे निघाले. मी मात्र फोटो घ्यायला ज़रा मागे थांबलो. काही वेळातच काळा कुळकुळीत असा नविनच बांधलेला पक्का डांबरी रस्ता सुरू झाला. 'अरे वा... चमत्कारच आहे ...' असे बोलून मी सुद्धा फटकन बाईकचा वेग वाढवत पुढच्यान्ना गाठले. अवघ्या १ किमी अंतरावर तो 'पक्का डांबरी रस्ता' संपला पण उजव्या बाजूला एक टेंट सदृश्य होटेल दिसले. आम्ही काय केले असेल ते सांगायला नकोच. :D



बाईक्स वरुन उतरलो तेंव्हा आमचा अवतार काय होता... बाईक वर वाळू, सामानावर वाळू, कपड्यांवर - बूटात - अंगावर सर्वत्र वाळूच-वाळू. वाळूमय झालो होतो आम्ही पूर्णपणे. हात आणि तोंड धुवून जेवायला बसलो. 'जे असेल ते आण रे' ... सवयीप्रमाणे तोंडातून वाक्य गेलं. बघतो तर काय... इकडे तर रोटी/चपाती, मसूरची आमटी, भात, अंड आणि मग्गी. वा. मस्त जेवण झाले. तिकडून निघालो तेंव्हा १ वाजून गेला होता. म्हणजे तेनसिंगने गाडी पांगला पोचवली सुद्धा असणार. आता आम्हाला सुद्धा लवकरात लवकर पांगला पोचणे आवश्यक होते. नशीब पुढचा रस्ता परत पक्का होता. १० मिं. मध्ये रस्त्यावर तेनसिंग गाडी घेउन उभा असलेला दिसला. म्हटले हा अजून इकडे काय करतोय. बघतोय तर गाडी मध्ये सामान नहीं की इतर टीम मेम्बर्स सुद्धा नाहीत. तेनसिंग त्यांना मेनरोडला पुढच्या गाड़ी मध्ये बसवून पुन्हा आम्हाला बघायला मागे आला होता. शिवाय पांगच्या दिशेने जाणारा एक शोर्टकट सुद्धा त्याला आम्हाला दाखवायचा होता. अजून एक वाळूने भरलेला कच्चा रस्ता.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - २१ लूप्स टू सरचू ... !.
.
.

2 comments:

  1. sahi :)
    paraticha pravas suddha thrilling hota mhanaycha !
    pan gud yaar tumhi koni panic zala nahit...

    ya trip madhe tumhi saglya prakarchya rastyavar gadi chalavali mhanaychi tar :) i m really jealous of u !!!

    do let me know about ur next trip to Ladakh i would like to join u :)

    ReplyDelete
  2. खरच पूनम ... इतके विविध आणि भन्नाट अनुभव आले ना ... अजून कही पुढच्या भागांमध्ये येतीलच ... ;)

    आणि हो पुढच्या ट्रिप चे प्लानिंग सुरू झाले आहे ... :D

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...