Friday 4 December 2009

लडाखचा सफरनामा - सारांश .. अर्थात माझ्या मनातला ... !

गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेला हा सफ़रनामा आजच्या ह्या पोस्टने संपतोय. आज हा सारांश पोस्ट लिहिताना माझ्या मनात नेमक्या काय भावना आहेत??? अगदी मोकळेपणाने सांगायचे झाले तर मनात खुप समिश्र भावना आहेत. ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. हाहा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत. ;) जितक्या जोमाने मी सप्टेम्बर – ऑक्टोबर  मध्ये लिखाणाला सुरवात केली तितक्या जोमात मला पुढे म्हणजे नोव्हेंबरमध्ये लिखाण करता आले नाही. त्यामुळे वाचकांची वाचण्याची लिंक तूटली हे नक्की. पण काही वाचकांनी माझ्याकडे पुढच्या लिखाणाची सारखी मागणी करत मला लिखाण लवकरात लवकर पूर्ण  करावयास हवे ही जाणीव करून दिली. त्या सर्वांचे खरच आभार.

लडाख मोहिमेच्या १३ दिवसांच्या आणि त्या आधीच्या तयारीचा सफरनामा मी अगदी मोकळेपणाने मांडला. पण आज थोड़े मनातले लिहायचे म्हटले आहे तर विचार काही करून कागदावर उतरायला तयार नाहीत. डोक्यात विचारांची गर्दी झाली आहे नुसती. बघुया किती प्रश्न कागदावर उतरवता येतात आणि किती प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देता येतात ते.

अगदीच सुरवात करायची झाली तर.. आम्ही लडाखला जायचे का ठरवले??? मी आणि अभी आम्ही दोघेसुद्धा बऱ्याच वर्षापासून लडाख प्लान नुसतेच आखत होतो म्हणुन?, एक साहसी मोहिम पार पाडावी म्हणुन?, आपल्याच देशाच्या एका अविभाज्य भागाचे निसर्गसौंदर्य बघायचे म्हणुन?, की सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे म्हणुन??? प्रत्येकाची उत्तरे  विभिन्न असतील. माझ्या स्वतःसाठी ही मोहिम प्रामुख्याने सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे ह्यासाठी होती. अर्थात एक साहसी मोहिम करत आगळे- वेगळे निसर्गसौंदर्य बघायचे हा उद्देश होताच. पण प्रत्येकाचे ह्या मोहिमेचे उद्दिष्ट वेगवेगळेच होते, त्यात कुठेही सुसुत्रता नव्हती आणि म्हणुनच अखेरपर्यंत पूर्ण टीममध्ये आवश्यक असा ताळमेंळ जमुन आला नाही. ज्या गोष्टीवर आम्ही प्लानिंग करण्यापासून भर देत होतो ती  गोष्ट अखेरपर्यंत आम्हाला साधता आली नाही हे या मोहिमेचे एक मोठे अपयश होते. अश्या मोहीमांमध्ये टीमचे एकच उदिष्ट आणि विचार असावे लागतात. तुमच्यापैकी बरेच जणांना असा प्रश्न पडला असेल की मी असे का म्हणतोय. इतक्या दुर्गम प्रदेशात इतक्या उंचीवर बाईक्स चालवून कुठलाही मोठा अपघात न होता आम्ही यशस्वीरित्या परत आलोय तरी ही मोहिम अपयशी ठरली???


माझ्या दृष्टीने अगदी अपयश म्हणता नाही आले तरी हे पूर्ण यश नक्कीच नव्हते. अनेक उणीवा आणि त्रुटी त्यात राहिल्या. हवी तशी एकत्र सुरवात करता आली नाही आणि शेवट तर निराशाजनक ठरला. दिल्लीमध्ये 'इंडियागेट'ला 'अमर जवान ज्योती' येथे नतमस्तक होउन मोहिमेचा शेवट करायचा असे माझे मत होते आणि अभीने त्याला मान्यता दिली होती. पण तसे होऊ शकले नाही. कारणे काहीही असोत. पण ते धैय गाठण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मी कधीच विसरु शकणार नाही. मला हे सुद्धा माहीत नाही की आमच्यापैकी किती मेंबर्सना त्याबद्दल वैषम्य वाटत असेल. मी मात्र आजही तितकाच खिन्न आहे जितका दिल्लीवरुन निघताना होतो. एखाद्या गोष्टीचा शेवट गोड झाला की ती गोष्ट कशी पुर्णच गोड लागते, तसे काही येथे घडले नाही. पण ह्या सर्व गोष्टींकडे मी नकारात्मक दृष्टीने बघतोय असे नाही. सकारात्मक दृष्टीने बघायचे झाल्यास असे म्हणता येइल की ह्या चूकांमूळे आता आम्हाला ही किंवा अशीच एखादी मोहिम पूर्णपणे यशस्वी करून दाखवावी लागेल. तेंव्हा कुठे मन शांत होइल आणि त्याचे प्लानिंग सुरू देखील झाले आहे. (माझ्यापुरते)

आज ३ महिन्यांनी सुद्धा लडाख असे उच्चारले किंवा मनात आले की आठवणी उचंबळून येतात. पार केलेला तो एक-एक पास, केलेली ती एक-एक चढ़ाई, गाठलेली सर्वोच्च उंची आणि तेथे घालवलेला एक-एक क्षण. क्षण जे होते आनंदाचे... क्षण जे होते अभिमानाचे... क्षण जे होते आत्मविश्वास वाढवणारे...



कारगिल – द्रास येथे जाउन आपल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचे क्षण, लेहमधील १५ ऑगस्ट अनुभवण्याचे क्षण, १८००० फुट उंचीपेक्षा उंच अश्या जगातील सर्वोच्च रस्त्यावरून बाईक चालवण्याचे क्षण आणि तेथे तिरंगा फड़कवण्याचे क्षण... शब्द अपुरे पडतील असे पेंगोंग आणि त्सो-मोरिरी येथील सौंदर्याचे क्षण, पांगच्या वाळवंटामधले आणि रोहतांगच्या चिखलातील राद्याचे क्षण. असे कितीतरी क्षण आज आठवणी बनून मनात साठवून ठेवल्या आहेत.

ही ब्लॉगपोस्ट संपवायच्या आधी मला खास करून इकडे 'अभिजित'चा विशेष उल्लेख करायला अतिशय आनंद होतोय. गेल्या सर्व पोस्ट्समध्ये त्याने ह्या मोहिमेत किती मोलाची भूमिका बजावली हे वाचक जाणतातच. तरीसुद्धा त्याचा उल्लेख केल्याशिवाय ही पोस्ट संपवणे योग्य ठरणार नाही. ट्रिपच्या प्लानिंगपासून ते ट्रिप पूर्ण होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी त्याने एकट्याने ज्याप्रकारे पेलली (जे फ़क्त त्यालाच शक्य होते) त्यासाठी त्याला खरच हाट्स ऑफ. उगाच आभार वगैरे मानत नाही मी, कारण ते त्याला आवडणार देखील नाही. मी त्याला जमेल तशी मदत करेन असे जरी ठरले होते, तरीपण माझ्या कामाच्या व्यापामुळे ते शक्य तर झाले नाहीच, उलट माझा अधिक व्याप त्याला सहन करावा लागला. त्याने माझ्याकडे कुठलीही तक्रार न करता ट्रिपचाच एक भाग म्हणुन मान्य केला हा त्याच्या मनाचे मोठेपण.


आशिष म्हणजे माझा दादा आधी सुट्टी मिळत नसल्याने लडाखला येणार नव्हता पण अखेर मी त्याला येण्यासाठी तयार केलेच. तो असल्याने मला बाईक लोड करणे आणि परत आणणे याचे टेंशन राहिले नाही. त्याने ती जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडून माझ्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. उमेश, अमेय साळवी, अमेय म्हात्रे आणि कुलदीप यांनी ह्या ट्रिपमध्ये अनेक उत्कृष्ट फोटो काढले. त्यांनी ते मला विनासायास येथे वापरायला उपलब्ध करून दिल्याबद्दल खरच धन्यवाद. शमिका आणि मनालीने माझ्या आणि अभीच्या मागे चालत्या बाईकवर बसून अनेक चांगले फोटो टिपले. मनालीने तर काही व्हीडिओस देखील घेतले जे मला ब्लॉगसाठी खुपच उपयुक्त ठरले. साधना आणि उमेशने ह्या मोहिमेचे IBN-लोकमतसाठी संपूर्ण शूटिंग केले जे २ भागात दाखवण्यात आले. त्यातला १५ ऑगस्टचा भाग तर अप्रतिमच झाला होता. ह्या ट्रिपमध्ये सर्वात जास्त मज्जा ज्यांनी केली ते दिपाली आणि शोभित. अभिला सर्वात कमी त्रास ह्या दोघांनी दिला असेल. नाहीच दिला असे म्हटले तरी हरकत नाही. आदित्य, पूनम आणि ऐश्वर्या ह्या अंबरनाथच्या टीमने देखील ह्या ट्रिपमध्ये जान आणली.

या लेखातून १५ मेंबर्सच्या १३ दिवसाच्या एका थरारक मोहिमेचा पुन्हा एकदा शेवट होतोय. '१३ दिवसात २८१८ किलोमिटर्सचा' प्रवास करून अनेक अनुभव घेउन सफळ संपूर्ण झालेली ही भ्रमंती शेवटपर्यंत लक्ष्यात राहील यात काही शंका नाही. ह्या ब्लॉग लिखाणातून मी काय साधले? बरेच काही. पुन्हा ते क्षण जगण्याचा आनंद आणि ते तुम्हा सर्वांसोबत वाटण्याचा आनंद सुद्धा. माझ्या लिखाणाच्या यथाशक्तिनुसार तो इकडे मांडायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे की आमचा हा सफ़रनामा तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

आज हा सफ़रनामा संपतोय याचा अर्थ हा ब्लॉगसुद्धा बंद असा होत नाही. ह्या ब्लॉगचे नाव ‘माझे भारत भ्रमण’ असे आहे. तेंव्हा काही काळाने पुन्हा येथेच भेटुयात माझी अजून एक हटके आणि आठवणीन्नी भरलेली भ्रमणयात्रा घेउन... तो पर्यंत 'टाटा' ...
.
.
.

Thursday 3 December 2009

लडाखचा सफरनामा - ये दिल्ली है मेरे यार ... !

'संपतोय की नाही' असे वाटणार्‍या त्या दिवसाचा अखेर काळ पहाटे ४ वाजता अंत झाला होता. त्यानंतर बिछान्यावर पडल्या पडल्या मला झोप लागली. पण तासाभरात पहाटे ५ वाजता कसल्याश्या वासाने मला श्वास गुदमरून जाग आली. बघतो तर काय... माझ्या अवघ्या मीटरभर बाजूला एसीच्या पॉवरसप्लायमधून प्रचंड धूर निघत होता. संपूर्ण खोली धुराने भरली होती. काही क्षणात तो आता पेट घेईल अशी वेळ आली होती. मी पटकन शमिकाला उठवले आणि सर्व सामानघेउन खोली बाहेर पडलो. सकाळी लगेच निघायचे असल्याने सर्व सामान बॅगेतच होते. बाजूच्या खोली मधून अमेय आणि कुलदीपला उठवून शमिकाबरोबर थांबायला सांगितले आणि मी पुन्हा खिडक्या उघडायला खोलीत शिरलो. त्या २-३ मिन. मध्ये धूर इतक्या प्रमाणात वाढला होता की आतसुद्धा जाता येत नव्हते. मी तसाच मागे आलो आणि वॉचमनला बोलवायला गेलो. ते दोघेतिघे आले आणि मग खालून मेन पॉवरसप्लाय कट केला तेंव्हा कुठे धूर यायचा थांबला. आम्ही मग दुसर्‍या खोलीत झोपायला गेलो. तास-दोनतास झोपून लगेच उठलो आणि आवरायला लागलो. ९ वाजता आम्हाला दिल्लीसाठी निघायचे होते ना.

कालचा थकवा आज सकाळी जास्त जाणवत होता. मी आज गाडीमध्ये बसायचा निर्णय घेतला आणि बाइक आशिषने घ्यायचे ठरले. निघायच्या आधी कुणाल आम्हाला भेटायला आला होता. त्याला खरंतर आम्हाला चंदिगढ फिरवायचे होते पण आम्हाला ते काही जमले नाही. त्याला टाटा करून हॉटेल वरुन निघालो आणि सर्वांनी गरजेपुरते पेट्रोल भरून घेतले. आणि मग सुरू झाला शेवटच्या २०० किमी.चा प्रवास. सकाळी निघताना नाश्ता केला नव्हता आणि लंचला कुठे थांबणार नव्हतो म्हणून एक 'ब्रंच' करायचे ठरले. अंबाला येथे हायवेलाच 'सागररत्न' म्हणून एक मस्त साउथ इंडियन हॉटेल आहे. तिकडे तासभर फूरसत मध्ये जेवलो. काहीच घाई नव्हती कारण दुपारी ४ पर्यंत दिल्लीगाठून 'इंडियागेट'ला पोचणे सहज शक्य होते. आम्ही कुरुक्षेत्र - पानिपत - सोनिपत पार करत वेगाने दिल्लीकडे सरकत होतो. खरं तर ह्या ठिकाणी सुद्धा जायचे होते मला. पण वेळे अभावी ते शक्य नव्हते. ४ वाजता आम्ही बरोबर आय.एस.बी.टी. (ISBT) पार करत दिलीमध्ये प्रवेश केला आणि आमचे स्वागत करायला वादली वारा आणि प्रचंड पावसाने तिकडे हजेरी लावली. पाउस अस्सा लागला की काही मिन.मध्ये सगळीकडे प्रचंड ट्रॅफिक जमले आणि पुन्हा एकदा आमच्या वेळेचा बोजवारा उडाला. बायकर्स कुठे आहेत? आपण कुठे आहोत याचा काही-काही पत्ता लागत नव्हता. ट्रॅफिक मध्ये २-३ तास असेच वाया गेले. अंधार सुद्धा पडला आणि 'इंडिया गेट'ला पोचायची शक्यता धूसर झाली.

८ वाजायच्या आधी आम्हाला बाइक्स स्टेशनला नेउन लोड करणे सुद्धा गरजेचे होते तेंव्हा आता सर्व बायकर्सनी थेट दिल्ली स्टेशन गाठायचे आणि गाडीने चाणक्यपुरी मधले  व्हाय.एच.ए.आई. (YHAI) गाठायचे असे फोनवर ठरले. मध्ये एकेठिकाणी राजपुताना रायफल्सचे मुख्यालय दिसले. देशाचा झेंडा हातात घेउन कारगिल युद्धात विजयश्री खेचून आणणार्‍या जवानांचे स्मारक पाहून गेल्या १२ दिवसांची आठवण आल्यावाचून राहिली नाही. तिकडून मी गाडी घेऊन चाणक्यपुरीला पोचलो आणि जागा ताब्यात घेऊन सामान सेट केले. एव्हाना अभी, अमेय, आशिष, कुलदीप आणि आदित्य दिल्ली स्टेशनला बाइक्स लोड करायला पोचले होते. आमच्या बाइक्सचे पेपर्स नेमके माझ्याकडे असल्याने मला पुन्हा ते घेउन स्टेशनला जाणे भाग होते. शिवाय मला आणि शमिकाला तिच्या मामाकडे सुद्धा जायचे होतेच. मग आम्ही पुन्हा निघालो त्या ट्राफिक मधून रस्ता काढत. ह्यावेळी गाडी नव्हती, निघालो होतो रिक्शा मधून. कसेबसे ते स्टेशनला पोचलो. फोन वर, 'अरे इकडे SBI ATM च्या बाजूला उभा आहे रे, झाड, एक मोठे झाड दिसते का?' असे लैंडमार्क शोधत-शोधत भेटलो त्यांना. पेपर्स दिले आणि मामाकडे जाउन येतो म्हणुन तिकडून निघालो. विकासपुरीला मामाकडे पोचलो. त्यांना भेटलो. शमिकाला तिकडेच रहा आज. उदया सकाळी मी परत घ्यायला येइन, असे सांगून मी निघालो पुन्हा चाणक्यपुरीला यायला निघालो. ११ वाजता पोचलो तेंव्हा सर्वजण बाईक्स लोड करून पोचले होते. आता अखेरच्या सामानाची बांधाबंध सुरू झाली. 'अरे हे तुझे इतके दिवस माझ्याकडे पडले आहे. हे घे.' 'माझे नहीं आहे रे ते, कोणाचे काय-काय उचलतोस तू. तुलाच लक्ष्यात नसते' असे करत करत प्रत्येकाने आपापले आणि बहुदा काही दुसऱ्याचे सुद्धा सामान बांढले. मोजुन १-२ असलेल्या चार्जिंग पॉइंट्सवर बरेच मोबाएल वेटिंग वर होते. 'बास झाल रे इतका घरी जाईपर्यंत. आता हा लाव चल.' असे करता करता १ वाजून गेले. अर्धे झोपले म्हणुन मी आणि अभी लैपटॉप घेउन खोली बाहेर बसलो होतो. मी माझी आणि शमिची टिकिट्स बदलून संध्याकाळची करून घेतली.


पहाटे ३:३० वाजता सर्वांचा पुन्हा एकदा गलका सुरू झाला. पहाटे-पहाटे फ्लाइट्स असल्याने ४:३० पर्यंत निघणे आवश्यक होते. ४ वाजता बाहेर पडलो. जायच्या आधी साधनाने सर्वांचे बाइट्स रेकोर्ड करून घेतले. त्या सर्वांना सोडून मी, साधना आणि उमेश परत खोलीत येउन पडलो. साधना आणि उमेश ज़रा उशिराने दुसऱ्या फ्लाइटने जाणार होते. ते सुद्धा पहाटे ६:३० नंतर निघाले. जाता-जाता ते इंडियागेट वर काहीवेळ थांबून एक क्लोसिंग शोट घेउन मगच पुढे जाणार होते. ते दोघे गेल्यावर मात्र मला तिकडे १ क्षण सुद्धा जड जात होता. इतक्या दिवसात अश्या शांततेत एकता राहणे हे काय असते ते माहीत नव्हते ना. तिकडे ते १० जण एकाच फ्लाइटमधून मुंबईला निघालेले. काय गोंधळ घातला असेल फ्लाइटमध्ये देवजाणे. मी माझे सामान बांधले, चेकआउटच्या फ़ोर्मालिटीज पूर्ण केल्या आणि विकासपुरीला पोचलो. तिकडून दुपारच्या फ्लाइटने मी सुद्धा संध्याकाळपर्यंत १४ दिवसाच्या प्रवासानंतर 'जिवाची मुंबई' करत मुंबईला पोचलो. १४ दिवसांच्या एका अविस्मरणीय अश्या प्रवासानंतर मनात खुप विचार सुरू होते... आजही आहेत... आणि  पुढेही राहतील... ते विचार अजून तुमच्या समोर लिहायचे आहेत. तेंव्हा भेटूया लडाखचा सफरनामाच्या शेवटच्या भागात ... मोहिमेचा सारांश घेउन ...
.
.
.
अंतिम भाग : लडाखचा सफरनामा - सारांश .. अर्थात माझ्या मनातला ... !
.
.
.

Wednesday 2 December 2009

लडाखचा सफरनामा - 'बियास'च्या सोबतीने ... !

विचार करता करता रात्री झोप कधी लागली समजलेच नाही. सकाळी बियास नदीच्या खळाळत्या पाण्याच्या आवाजाने जाग आली. पुन्हा एकदा निघायची तयारी सुरू केली. ८ वाजता नाश्ता करायला मार्केटमध्ये जायचे होते. अभी-मनाली आणि अमेय मात्र गाडी हायर करायला आधीच पुढे गेले होते. मार्केटमध्ये बारीक - सारिक खरेदी करून ११ च्या आसपास मनाली सोडायचे असे पक्के केले होते. नाश्ता झाल्यावर सर्वजण खरेदीला लागले तर मी, अभी आणि अमेय आमच्या ओळखीच्या एका मित्राला, 'गोकुळ'ला भेटायला गेलो. गोकुळ आम्हाला दिल्लीपर्यंत दुसरी गाडी करून देणार होता. त्याच्याबरोबर चहा पिता-पिता गप्पा मारत बसलो होतो. काल रात्रीपासून फोन सुरू झाले होते तेंव्हा अधूनमधून फोन सुद्धा येत होते. ह्या तासाभरात फोनवर बऱ्याच गोष्टी कळल्या. दिघेफळला विट्ठलचे वडील वारले होते. तिकडे दुसरीकडे शमिकाच्या दिल्लीच्या आजीचे दोन दिवसांपूर्वी देहावसान झाले अशीही बातमी कळली. एक बातमी चांगली येत नव्हती... आत्ता आम्हा दोघांना दिल्ली लवकरात लवकर गाठणे आवश्यक होते. पण त्याला किमान २ दिवस तरी लागणार होतेच. बायकर्सनी निघायला १२ वाजवले. तर गाडीमधून येणारे १ नंतर निघणार होते. तितक्या वेळात ते ओल्ड मनाली मधले हिडिंबा माता मंदिर पाहून आले. आम्ही मागच्या वेळी ते पाहिले असल्याने तिकडे काही वळलो नाही. आम्ही सरळ कुल्लू - भूंतरच्या मार्गाला लागलो. इतके दिवस आम्ही कमी रहदारीच्या भागातून बाईक्स चालवत होतो. आज मात्र रहदारी जास्त जाणवत होती. तेंव्हा जास्त वेगाबरोबर जास्त काळजी घेणे आवश्यक होतेच.








मनालीहून निघाल्या पासून बियास नदी आपल्याला सोबत करते. डाव्या हाताला नदी आणि उजव्या हाताला डोंगर आणि मध्ये 'S' आकाराच्या वळणा-वळणाचा रस्ता पतलीकूहल, कुल्लू करत भुन्तरपर्यंत जातो. आत्ता कुल्लूजवळ बियासनदीवर ब्रिज बांधल्यामुळे कुल्लू मार्केटमध्ये घुसावे लागत नाही. त्याने बराच वे ळ वाचतो. भुन्तरला पोचलो तेंव्हा २ वाजत आले होते. जेवायचा अजुन काही पत्ता नव्हता तेंव्हा किमान एक चहा घ्यावा म्हणून थांबलो. खरे तर ऐश्वर्याला सफरचंद घ्यायची होती म्हणून तिने सर्वांना थांबवले होते. सफरचंद घेतली पण चहा घेतलाच नाही. भलताच राडा झाला एकडे. रस्त्याच्या कडेला उभे असताना एका स्थानिक मुलाचा मनाली, साधनाला धक्का लागला (की त्याने जाणून बुजून मारला) ह्यावरून त्याची आणि अभीची बाचाबाची झाली. आणि मग ती बा-चा-बा-ची इथपर्यंत गेली आणि हाणामारीला सुरवात झाली. हे सर्व इतक्या पटकन घडले की विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. २ एक मिनिटात सर्व शांत झाले पण मग गर्दी जमली आणि आता हे प्रकरण काहीही चुक नसताना आपल्यालाच महाग पडणार अशी चिन्हे दिसू लागली. 'उसने अपूनको १० मारा, अपूनने दोहि मारा लेकिन क्या सॉलिड मारा' ह्या स्टाइलने आम्ही मारामारी करू शकत होतो पण ५ मुली आणि ५ बाइक्स सोबत असताना असे करणे अविवेकीपणा ठरला असता. तेंव्हा तिकडून शिस्तीत निघालो आणि मंडी - बिलासपुरच्या रस्त्याला लागलो.


आता रस्त्याच्या कडेला छान-छान सफरचंदाची झाडे, गुलाबाच्या बागा अशी दृश्‍ये होती. पुढे लगेच मंडी बोगदा लागला. हा बोगदा जवळ-जवळ ३ किमी लांब आहे. आणि हो आतमध्ये लाइटस नाहीत बरं का. तेंव्हा सावधान. तो पार केला आणि मंडीला पोचलो. ४ वाजून गेले होते. भुका लागल्या होत्या. तेंव्हा आता जेवाय करायला थांबणे गरजेचे होते. जेवण उरकतो तोपर्यंत मागून गाडीमधून बाकीचे मेम्बर्स सुद्धा येऊन पोचले. नेहमी गोंधळ घालत गप्पा मारत असणारे सर्वजण आज असा शांततेत जेवण का करत आहेत असा त्यांना प्रश्न पडला होता. झाला प्रकार कोणालाच माहीत नव्हता. ५ वाजता तिकडून निघालो तेंव्हा गाडी पुढे निघून गेली. आम्ही मागाहून निघालो. अभी - अमेय पुढे तर अमेय म्हात्रे आणि आदित्य मागे. मी मध्ये राहून सरवण मध्ये समान अंतर ठेवायचा प्रयत्न करत होतो. अचानक माझ्या म्हणजे बाइक्सच्या हा.. :P मागच्या चाकात हवा कमी होत आहे असे जाणवल्याने मी बाइक स्लो केली. आदित्य , अमेय सुद्धा पुढे निघून गेले. हळू हळू बाइक चालवत एके ठिकाणी हवा भरली आणि पुढे निघालो. अंधार पडत यायला लागला होता. आता मी थोडा वेग वाढवून पुढे गेलेल्या इतर बायकर्स ना गाठण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात एका हॉटेल मध्ये चहा घ्यायला सर्वजण थांबलेले दिसले. म्हणजे थांबले होते माझ्यासाठी पण मग नुसते थांबून काय करायचे? मग लगेच चहा हवा ना...  तिकडून १५ मिन. मध्ये निघालो आणि पुढे निघालो. चंदिगढसाठी अजुन १०० किमी. अंतर जायचे होते. कितीही बाइक चालवली तरी रस्ता काही संपत नव्हता. तिकडे चंदिगढमध्ये माझा मित्र कुणाल आमची वाट बघत होता. पुन्हा सर्वांना भुका लागल्याने 'कीरतपूर साहेब'च्या अलीकडे अखेर १०:३० च्या सुमारास जेवायला थांबलोच एके ठिकाणी. अजुन ८० किमी अंतर जायचे होते. त्यात पुन्हा एकदा ह्या पुढचा रस्ता म्हणजे आनंदीआनंद होता. आम्ही बाइकट्रिप साठी येणार म्हणून सर्व ठिकाणच्या रस्त्यांची कामे सरकारने काढली होती की काय असा प्रश्न पडला होता मला. धुळीने भरलेल्या त्या कच्च्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या गाड्यांच्या प्रखर हेडलाइटस मध्ये बाइक चालवणे हे खरोखरच दिव्य होते.

१२ वाजत आले होते आणि सतत १२ तास रायडिंग करून सर्वच थकले होते. गाडी बरीच पुढे निघून गेल्याने आता रायडर्स किंवा पीलियन बदलणे सुद्धा शक्य नव्हते. गेल्या ११ दिवसांच्या रायडिंग मध्ये 'कधी संपणार हा रस्ता' अशी भावना मनात येत होती. तिकडे अभी सॉलिड झोपेत बाइक चालवत होता. त्याच्या मागून येणार्‍या अमेयला हा आता बाइक वरतीच झोपेल की काय अशी शंका येत होती. मनाली अभीला जागे ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न करत होती. मागे अमेय आणि दीपालीची अखंड बडबड सुरुच होती. अश्या निर्जन रस्त्यावर कुत्रा सोडा पण एक चिटपाखरू सुद्धा नव्हते. दूरदूर वर लाइटस नव्हते. त्यामुळे ह्या अनोळखी भागात थांबणे ही शक्य नव्हते. अखेर एके ठिकाणी कुठल्याश्या कंपनीच्या गेटवर लाइटस मध्ये थांबलो. मागून अभी - अमेय आल्यावर पुढे निघालो. मध्येच एके ठिकाणी ट्रॅफिक लागले रस्त्यावर. बघतो तर रेल-वे फाटक. मी, आदित्य आणि अमेय फाटक पार करून पुढे असलेल्या पेट्रोल पंपावर थांबलो. अभी आज भलताच स्लो झाला होता. तो मागाहून आल्यावर आम्ही परत पुढे निघालो. एव्हाना गाडी हॉटेल 'पार्क व्यू'ला पोचली होती आणि आशिष व उमेश कुणालला जाउन भेटले होते. तो त्याची गाडी घेऊन आम्हाला शोधत मागे यायला निघाला. अखेर एक-एक करून आम्ही हॉटेलला पोचलो तेंव्हा पहाटेचे ३:३० झाले होते. १५ तास बाइक चालवुन आमचे काय झाले होते ते वेगणे सांगायला नकोच...

'तुम सब नहाके फ्रेश हो जाओ. मे खाना लेके आता हु' असे बोलून कुणाल गेला. खरे तर कोणालाच काही खाण्याची इच्छा नव्हती पण मी त्याला बोललो. 'सब थक गये है यार. सोने दे उन्हे. कल सुबह देखेंगे.' तो मात्र मानला नाही. मानला तर पंजाबी कसला. 'तू पंजाब आया और मैने खातीर ना की तो मेरी तो नाक कट गाई यार.' असे बोलून तो खायला आणायला गेला. मी सुद्धा आवरून घेतले. आंघोळ केल्यावर मात्र मलापण भूक लागली. अभी-मनाली आणि साधना मात्र आडवे झाले होते कुणालने आणलेले बटर चिकन, रोटी आणि राइस खाउन बाकी सर्वांच्या जान मे जान आ गयी. पहाटे ४ वाजता अखेर सर्वजण आपआपल्या खोल्यात जाउन गुडूप झाले. एका 'संपतोय की नाही' असे वाटणार्‍या दिवसाचा अखेर अंत झाला होता. पण अजुन काहीतरी घडणे बाकी होते. आमच्या खोलीमध्ये तासाभरात पहाटे ५ वाजता कसल्याश्या वासाने मला श्वास गुदमरून जाग आली. बघतो तर काय... बघुच पुढील भागात काय झाले ते...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - ये दिल्ली है मेरे यार ... !
.
.
.

Tuesday 1 December 2009

लडाखचा सफरनामा - रोहतांगचा चिखल सारा ... !


लेहच्या ११००० फुटावर ४-५ दिवसांच्या वास्तव्यात रात्री सुद्धा काही थंडी लागली नव्हती. काल रात्री मात्र सरचूला आलो तेंव्हा बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. तरी सुद्धा १५००० फुटावर  रात्री जाणवायला हवी इतकी काही जाणवली नाही. पहाटे सर्वजण उठले तेंव्हा मात्र बऱ्याच जणांना थंडी जाणवत होती. मला मात्र तसे काहीच वाटत नव्हते. का कोण जाणे... असो. सकाळी ६ वाजता नित्यनियमाने आवराआवरी केली आणि आमच्या नाश्त्याआधी बाईक्सना सुद्धा नाश्ता देणे आवश्यक आहे हे कळून आले. खास करून अमेय आणि कुलदीप यांच्या बाईक्स पेट्रोल पित होत्या. तेंव्हा आदित्य पेट्रोल आणायला ड्रायव्हरला घेउन परत १० किमी. मागे गेला. बराच वेळ होता म्हणुन आसपासचे फोटो काढत बसलो. रात्री इकडे आल्याने कैंपसाइट नेमकी कशी आहे ते सकाळी कळले. रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार गालिच्यावर डोंगरांच्या पाय्थ्याला असणाऱ्या या साइटचे सौंदर्य काही वेगळेच होते. दुरवर बारालाच्छा-लाचे पर्वत दिसत होते. पहाटे-पहाटे त्या पर्वतांवर जमलेल्या ढगांमुळे मनात एक शंकेची पाल चुकचुकून गेली. काही वेळात त्याच दिशेला आम्हास कुच व्हायचे होते. आमची पेटपूजा आणि सर्वांच्या बाईक्सची पेट्रोलपूजा झाल्यावर आम्ही बारालाच्छा -लाच्या दिशेने निघालो. एव्हाना सर्वजण आटपून निघायला तयार झाले होते. निघायच्या आधी साधनाच्या पेटंट पोस 'चला तरं मग' च्या स्टाइलमध्ये एक ग्रुप फोटो काढला.





सरचूवरुन पुढे निघालो तेंव्हा ७:३० होउन गेले होते. ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे पुढे रोहतांग जवळ पाउस नक्की आपल्याला गाठणार तेंव्हा आत्ता जास्तीतजास्त अंतर कमीतकमी वेळात पार करायला हवे होते. बारालाच्छा-ला पार करताना १३२८९ फुट उंचीचा फार त्रास झाला नाही. तासाभरात तो पार करून 'झिंग-झिंग बार' या ठिकाणी आम्ही पोचलो. 'झिंग-झिंग बार' म्हणजे खादाडीचे ठिकाण. एक छोटेसे पण मस्तसे टुमदार टेंट होटेल आहे इकडे. तिकडे नाश्ता घेतला. एक जोडपे हे होटेल चालवते. त्यांच्या मुलाने म्हणजे समीरने आम्हाला त्याची छोटी सायकल चालवून दाखवली. वेळ मस्त गेला तिकडे. पण उशीर सुद्धा झाला. ड्रायव्हरसाठी हे सर्व नेहमीचेच होते तेंव्हा तो बोंबा मारत होता पण आम्हाला मात्र हे सर्व नवीन आणि वेगळे होते ना. तिकडून निघायला जवळ-जवळ ९:३० होउन गेले. 'जिस्पा'च्या दिशेने पुढे निघालो तशी झटाझट उंची कमी होत होती. 'दारचा'ला पोचलो आणि पावसाचे आगमन झाले. अगदी भुरभूरत पडणारा पाउस. अंगाला न लगता भिजवणारा. जिस्पा मागे टाकत किलोंगच्या दिशेने निघालो तसे पाउस वाढतोय हे लक्ष्यात आले. वळणा-वळणाच्या त्या रस्त्याचा मनालीला गाडीमध्ये बसून त्रास व्हायला लागला होता तेंव्हा ती पुन्हा अभीच्या मागे बाईकवर बसली आणि शोभित गाडीमध्ये आला. पावसामुळे बायकर्स मागे पडले होते आणि आम्ही गाडी मधून वेगाने पुढे जात होतो. मध्ये एके ठिकाणी 'स्पिती व्ह्याली' कडे जाण्याचा रूट दिसला. ट्रेक्किंगसाठी हा एक परवानी असलेला भाग. किलोंगला पोचलो आणि बायकर्सची वाट बघत थांबलो ज़रा. एक चहा घेतला आणि ज़रा मोकळे सुद्धा झालो. ;) पावसाने भलतीच गर्दी केली होती. मागुन एक एक बायकर येताना दिसू लागले तसे आम्ही पुढे निघालो.



ह्या पुढचा संपूर्ण रस्ता म्हणजे स्वर्गाकडे जाणारा की काय असेच वाटत होते. डोंगरांची आणि झाडांची दाटी वाढली होती पण रस्त्याची रुंदी काही वाढत नव्हती... एका बाजूला पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला दरी. आपल्या माळशेज - ताम्हीणी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये जसे हिरवेगार दृश्य दिसते तसे काहीसे दृश्य सगळीकडे दिसत होते. मधून-मधून एखादा धबधबा डोंगरातून डोके वर काढी. दुरवरच्या पर्वतांवर वृक्ष आता त्या कडयान्ना भीत नव्हते. कितीही उंच आणि सरळसोट कडा असला तरी त्याला न जुमानता ते सूचिपर्णी वृक्ष आकाशाला भिड़त होते. त्यांच्या पायथ्याला खाली दरीपर्यंत हिरवळीचे गालीचे पसरलेले होते. दरीमध्ये फुलांनी, छोट्या छोट्या घरान्नी आणि रस्त्यांनी नक्षीकाम केले होते. आता आम्ही गोंधला, सिस्सू पार करत 'काकसर'कडे निघालो होतो. (बटालिकचे काकसर हे नव्हे. ते द्रास जवळ येते.) सिस्सू येता येता आम्ही घाटाच्या रस्त्याने पूर्ण खाली उतरत नदीकाठी आलो आणि ब्रिज पार करत दुसऱ्या बाजुला पुन्हा वर चढू लागलो. जेंव्हा बऱ्यापैकी उंचीवर गेलो तेंव्हा उजव्या हाताला एक भला मोठा धबधबा नजरेस पडला. बाजुच्या फोटो मध्ये बघाल तर २ टप्प्यामध्ये पडणाऱ्या ह्या धबधबाचा १ टप्पा किमान ४००-५०० फुट होता. वरच्या ग्लेशिअर मधून निघून तो नदीसोबत पुढच्या प्रवासाला निघाला होता. ते दृश्य पाहण्यासाठी काही क्षण तिकडे थांबलोच. "चलो अभी. खाना भी खाना है आगे जाकर." ड्रायव्हरच्या वाक्याने भानावर आलो आणि पुढे निघालो. २ वाजत आले होते. पावसात भिजतभिजत सर्व 'काकसर'ला पोहोचलो आणि एक मस्त होटेल सापडले. तिकडचा हिमाचली टोपी आणि कोट घातलेला मालक 'चाचा' पण मस्त होता. गरमागरम रोटी आणि सोबत चण्याची भाजी. सोबत कसलीसी चटणी होती. नंतर डाळभात.





३ वाजता तिकडून पुढे निघालो. मनाली साठी अजून ७० किमी अंतर जायचे होते आणि मध्ये उभा होता 'रोहतांग पास'. इकडे पडलेल्या धो-धो पावसाने आमच्यासाठी पुढे काय वाढून ठेवले आहे याची आम्हा कोणालाच कल्पना नवहती. ड्रायव्हरला होती नक्कीच पण तो काही आधी आम्हाला तसे बोलल नाही. इकडून १४ किमी. 'रोहतांग टॉप' आणि पुढे ८ किमी उतरून पलिकडे 'मोहरी' हा बेस. बस ड्रायव्हर इतकेच सांगत होता. सकाळपासून बाईकवर असलेले भिडू आता गाडीत बसले आणि गाडीमधले बाईकवर. काकसरवरुन निघालो तेंव्हा समोर रोहतांग टॉपला असणारे पावसाळी ढग बरेच काही सांगून जात होते. निघाल्यावर अवघ्या मिनिटाभरात आत्ता पर्यंत पक्का असलेला रस्ता कच्चा झाला आणि सुरू झाला एक 'चिखलराडा' जो पुढचे २ तास सुरू होता. संपूर्ण १४ किमीच्या चढणीवर एके ठिकाणी सुद्धा रस्ता चांगला राहिलेला नव्हता. मोठ्या मोठ्या वाहनांनी होत्या-नव्हत्या रस्त्याचे कल्याण करून ठेवले होते. हे एक-एक मोठे-मोठे खड्डे. त्या खद्यांमधून चिखल निघून रस्त्यावर छोटे-छोटे डोंगर बनले होते. झिप-झाप-झुप अशी वेडीवाकडी बाईक चालवत चिखलाने आणि पाण्याने खड्डे चुकवत आम्ही टॉपकडे निघालो होतो. चारचाकी गाडयान्ना काय मागुन वेगाने येत होर्न मारायला. बालान्स तर बाइकवर आम्हाला करावा लागतो ना. तरी बराचवेळ आमची गाडी मागुन आम्हाला कव्हर फायर देत होती. हे.. हे.. जसजसे वरवर जाऊ लागलो तशी वळणे अधिक शार्प होऊ लागली. ह्यात प्रॉब्लम असा होता की जाणाऱ्या-येणाऱ्या गाडयान्नी रस्त्यावरचा सर्व चिखल एका कोपऱ्यात येउन जमा केला होता. त्यातून बाईक वर चढवणे आता अजून कठीण झाले होते. जवळून टर्न मारावा तर बाईक टायरला तितकी ग्रिप मीळणे शक्य नव्हते. शिवाय वरुन पाउस सुरूच होता की. पडायची भीती जास्त होती. तेंव्हा गरज पडली की पुन्हा मागच्याला उतरवून बाईक वर चढ़वायची असे प्रकार सुरू झाले. गेले २ दिवस वाळवंटामध्ये अनुभव घेउन आता तो चिखलात राबवत होतो आम्ही.





अखेर तासा-दीडतासाने सर्वजण कुठे टेकत, कुठे थांबत पावसात भिजत रोहतांगटॉपला पोचले. आणि मग सुरू झाला उतरणीचा प्रवास. हलक्या वजनाचे अभी-मनाली आधीपासून पुढेच होते. अमेय साळवीची बाईक ज़रा बसकी आणि मोठ्या हँडलची असल्याने तो बराच आरामात येत होता. मी, कुलदीप आणि आदित्यमध्ये होतो. सर्वांच्या मानाने बहुदा कुलदीपला जाड टायरच्या यामाहाचा ग्रिपसाठी बराच फायदा झाला इकडे. उतरणे अधिक कठीण जाणवत होते. कोपऱ्यावरचा चिखल वाढला होता आणि त्यातून बाईक्स सरकू लागल्या होत्या. आता कितीही उशीर होत असला तरी घाई करायची नाही हे स्पष्ट तत्व होते. एकेठिकाणी मागुन येणाऱ्या ट्रकला पुढे जाऊ देण्यासाठी मी अगदीच बाजुला गेलो. आता वाटल पडलोच. नशिबाने वाचलो. दुसऱ्या एके ठिकाणी तर पुढच्या गाडीच्या इतक्या जवळ आलो की आता थांबावे लागणार स्पष्ट होते. पण पाय टेकायचे कुठे? दोन्ही बाजुला फुट-अर्धाफुट चिखल. ट्रकच्या टायरने बनलेल्या रूटवरुन बाईक हाकत होतो आम्ही. अखेर एके ठिकाणी उजवा पाय टेकलाच. टेकल्या-टेकल्या लागला सरकायला. परत उचलला आणि टेकवला. पण तो कसला राहतोय. सरकतोच आहे तो आपला. मनात आले आता पडलोच आपण पक्के चिखलात. पण नाही. कसाबसा काही सेकंद उभा राहिलो आणि लगेच बाईक त्या गाडीच्या पुढे टाकली. आता मागुन येणाऱ्या एका सुद्धा गाडीला मी पुढे जाऊ देत नव्हतो. बरोबर ना... रिस्क कोन ले? बऱ्यापैकी खाली आल्यावर चिखल कमी झाला. पाउस सुद्धा बंद झाला होता. २ तास त्यांने पक्की परीक्षा पहिली होती रायडिंगची. ज़रा खाली 'मोहरी' दिसत होते आणि एकदम दुरवर बिआस नदीकाठचे मनाली शहर सुद्धा. बिआस नदी रोहतांग मधुनच उगम पवते. मोहरीला पोचलो, चहा घेतला आणि पुन्हा एकदा मोकळे झालो. फार वेळ नव्हता थांबायला. त्यात पूनम आणि ऐश्वर्याने पावभाजी ऑर्डर केल्याचे कळताच मी डाफरलो त्यांच्यावर.



सर्वजण तिकडून चहा घेउन आणि पूनम - ऐश्वर्या पावभाजी खाऊनच तिकडून निघाल्या. अजून मनाली गाठायला २ तास होते.इकडून पुढचा रस्ता एकदम मस्त होता. मख्खन के माफिक स्मूथ. संध्याकाळ होत आली होती तेंव्हा समोरून येणारे ट्राफिक सुद्धा फार नव्हते. गुलाबा (९३९७ फुट) - केठी - पालचन अशी गावे मागे टाकत आम्ही मनालीला जवळ करत होतो. इतक्यात पुढे रस्त्यावर ट्राफिक दिसले. ही..... लांब रांग. बघतोय तर एका ट्रकचा विली झाला होता. फोटो बघा म्हणजे कळेल मी काय बोलतोय ते. भन्नाटच प्रकार होता हा. लोखंडी सळ्यान्नी ओव्हरलोड केलेला ट्रक सरळ-सरळ उभा झाला होता. नशीब त्या ड्रायव्हरचे डावी-उजवीकडे नाही कलंडला. सर्व बायकर्स इकडे येउन पोचलो त्या आधीच गाडी इकडे पोचली होती. आम्ही येउन पोचलो तसे जमलेले सर्व देशी -विदेशी पर्यटक आमचे इतर टीम मेंबर्स असे सर्वजण टाळ्या वाजवायला लागले. त्या टाळ्या रोहतांगच्या यशस्वी रोहणासाठी होत्या. काहीवेळ खरेच मस्त वाटते आम्हाला. आता आम्ही त्या ट्राफिकमधून बाईक्स पुढ पर्यंत काढल्या. ट्रकच्या बाजूने पुढे जायला वाट दिसली तिकडून बाइक्स एक-एक करून पुढे काढल्या. आमचे ५ मेंबर्स गाडीसकट मात्र मागे अडकले होते. पण म्हणुन आम्ही सुद्धा तिकडे थांबून न रहता पुढे जाउन बाकी व्यवस्था बघणे महत्वाचे होते. गरज पडलीच तर मनालीहून त्यांच्यासाठी दुसरी गाडी पाठवणे महत्वाचे होते. अंधार पड़ता-पड़ता भांग गाव पार करत मनालीमध्ये प्रवेश केला आणि नदीकाठचे होटेल बिआस गाठले. अडकलेल्या मेंबर्सचा अपडेट घ्यावा म्हणुन फोन केला तर ते सुद्धा तिकडून निघाले असे कळले. गाडी आली तेंव्हा ९ वाजले होते. सामन रूम्स मध्ये लावले आणि अंगावरचा चिखल राडा साफ़ करून 'चंद्रताल'ला जेवायला गेलो. ऑर्डर आधीच देऊन ठेवली होती... झोपायला ११ वाजले. बिछान्यावर पडलो तेंव्हा मला आजची बाईक राईड राहून राहून आठवत होती. अगदी आत्ता सुद्धा तितकीच लक्ष्यात आहे... रोहतांगचा चिखलराडा पार करून आता आम्ही उदया बिआसच्या सोबतीने 'चंदिगढ़'साठी निघणार होतो...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा -बिआसच्या सोबतीने ... !
.
.
.

Sunday 29 November 2009

लडाखचा सफरनामा - २१ लूप्स टू सरचू ... !

ज्या शोर्टकटने तेनसिंग आम्हाला घेउन गेला त्या रस्त्यावरुन त्याची गाडी तर व्यवस्थित निघून गेली; आम्ही मात्र लटकलो. पुन्हा एकदा मागच्याला उतरवत तर कधी बाईक ढकलत वाळू खात-खात आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. किमान १०-१२ किमी.चा फेरा नक्कीच वाचला होता. आता पक्का डांबरी रस्ता लागला. चला आता पुढे तरी नीट मस्तपैकी जाऊ ह्या कल्पनेने मन सुखावले. पण काही कल्पना किती क्षणभंगुर ठरतात नाही...!!! २-३मिन. मध्ये तो सुखद रस्ता संपला आणि त्या पुढचा ३७किमि.चा पांग पर्यंतचा संपूर्ण रस्ता अतिशय भयानक अश्या परिस्थितिमध्ये आम्ही पार केला. पूर्ण रस्त्याचे काम सुरू होते. दुपारच्या त्या रणरणीत उन्हात चांगली किलोभर वाळू खात आम्ही पुढे-पुढे सरकत होतो. कधी बाईक सांभाळत तर कधी ती वाळूवरुन कशीबशी न पड़ता सरकवत. एका मोठ्या पठारावरून तो कच्चा रस्ता जात होता. उजव्या आणि डाव्या बाजूने असंख्य छोटे-छोटे रस्ते येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक्सनी बनवून ठेवले होते. ज्या जागेवरून ट्रक गेला असेल तिकडची वाळू दाबली गेली असल्याने त्याच जागेवरून आम्ही बाईक पुढे काढत होतो नाहीतर बाईक पूर्णवेळ ढकलतच न्यावी लागेल की काय असे वाटत होते. अखेर एके ठिकाणी आम्हाला उतरावेच लागले. बाईक्स जास्तीतजास्त पुढे नेउन पिलियन रायडरला आम्ही खाली उतरवले. मात्र कुलदीपने अमेय म्हात्रेला बरेच आधी उतरवले असल्याने तो जवळ-जवळ २५० मी. अंतर तरी चालून आला असेल. आल्यानंतर कुलदीपला शिव्या पडल्या हे काही वेगळे सांगायला नकोच ... दुरवर रस्ता वर चढत चांगला होत जातोय असे दिसू लागले आणि आम्ही आमच्या बाईक्सचा वेग वाढवला. पांगच्या ४ किमी. आधी रस्ता पुन्हा एकदा पक्का होत घाट उतरु लागला. खाली दुरवर काही दुकानी आणि गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. आम्ही समजलो.. हुशश्श्श्.. आले एकदाचे पांग.

पांगला गाडी मधून पुढे गेलेले सर्व टीम मेंबर्स भेटले. हातात तसा जास्त वेळ नव्हता पण किमान चहा घेउन फ्रेश झालो. कुलदीप आणि अमेय साळवीच्या बाईक्सना सुद्धा भूका लागल्या होत्या, त्यांची भूक भागवली. उगाच आमच्या बाईक्स निषेध करू नयेत म्हणुन त्यांना सुद्धा थोड़े खायला दिले. थकलेल्या रायडर्स आणि पिलियन रायडर्सनी आपल्या जागा गाड़ीमध्ये बदलल्या आणि अर्ध्यातासात आम्ही तिकडून पुढे सटकलो. अजून सरचू बरेच लांब होते. अंधार पडायला अवघे ३ तास उरले होते. त्याआधी 'लाचूलुंग-ला' आणि 'नकी-ला' पार करणे आवश्यक होते. तासाभरात 'लाचूलुंग-ला' समोर उभा राहिला. फोटू-ला, खर्दुंग-ला, चांग-ला असे एक-सो-एक अनुभव पाठीशी असल्याने लाचूलुंग-लाच्या १६६१६ फुट उंचीला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. तो पार करत आम्ही पुन्हा १००० भर फुट खाली उतरलो आणि लगेच 'नकी-ला' कडे मोर्चा वळवला. ६ वाजत आले होते आणि हवेत आता गारवा जाणवू लागला होता. नकी-ला च्या १५५४७ फुट उंचीवर पोचलो तेंव्हा इतकी थंडी वाढली की मी-शमिकाने बाईक थांबवून जाकेट्स अंगात चढवली. तिकडे मागे अमेयच्या बाईकवर बसलेल्या पूनमने पायात फ़क्त फ्लोटर्स घातल्याचे लक्ष्यात आले. ४ वाजता पांगला असताना ती गाडीमधून बाईकवर शिफ्ट झाली होती ते सुद्धा पायात सोक्स न घालता. आता थंडीने तिचे पाय गारठले होते. माझ्याकडे असलेले शमिकाचे एक्स्ट्रा सॉक्स तिला दिले तेंव्हा कुठे तिच्या जिवातजीव आला.

नकी-ला उतरु लागतो तसे २१ लूप्स समोर येतात. खाली-खाली उतरत जाणारा २१ वळण असलेला हा रस्ता अतिशय सुंदर आहे. पांगच्या वाळवंटामधून इकडे आल्यावर तर हा रस्ता आम्हाला स्वर्गाहून सुंदर असा भासत होता. शिवाय रुक्ष, झाडे नसलेल्या प्रदेशाच्या जागी आता हिरवी झाडे दिसू लागली होती. २१ लूप्सचा रस्ता १५३०२ फुट उंचीवरून सुरू होत १३७८० फुट उंचीवर येउन संपतो. म्हणजेच अवघ्या ८-१० किमी मध्ये थेट १५०० फुट खाली. २१ लूप्स जिथे संपतात तिकडे 'ब्रांडी नाला' आहे. ह्याचे नाव ब्रांडी नाला का ते माहीत नाही पण २१ लूप्स उतरल्यावर बहुदा ब्रांडी सारखी झिंग चढत असावी. आम्हाला तरी मस्तच झिंग चढली होती. ब्रांडीची नाही तर किमान रायडिंगची तरी. इकडून सरचू २१ किमी. लांब आहे. नाल्यावरचा ब्रिज पार करून पुढे निघालो. अंधार पडत आला असल्याने आमचा वेग पुन्हा कमी झाला होता. शिवाय रस्ता सुद्धा बराच वळणा-वळणाचा होता. ७:३० वाजता आम्ही सरचू मध्ये प्रवेश केला. गाडी पुढे गेली होती आणि रहायची सोय गाडीच्या ड्रायव्हरनेच केली होती. तेंव्हा आम्हाला आता त्या अंधारात त्याला शोधणे भाग होते. सरचूवरुन सुद्धा जवळ-जवळ ८ किमी. पुढे आलो तरी कोणी भेटेना. हवेत चांगलीच थंडी वाढली होती. टेम्परेचर ९ डिग. झाले होते. अखेर आर्मी पोलिसांच्या सांगण्यावरुन सर्वांना तिकडच्या एका चेकपोस्टवर थांबवले आणि मी-अभिजित शोधाशोध करायला अजून पुढे निघालो.

एका कैंपसाइट वर चौकशी करत असताना समोरून एक गाडी येताना दिसली. मी धावतच रस्त्यावर पोचलो आणि गाडीला हात केला. अंदाज बरोबर निघाला होता. उमेश ड्रायव्हरला घेउन आम्हाला शोधायला मागे आला होता. शेवटी ९ च्या आसपास सर्व साइटवर पोचलो. सर्वांना रहायच्या जागेत सामान टाकले आणि गरमागरम चहा घेतला. रात्रीच्या जेवणावर धमालच आली. आजचे एक-सो-एक किस्से एकमेकांना सांगत, ऐकवत वेळ भुर्रकन निघून गेला. आज खरच भन्नाट दिवस होता. जरी गेल्या २ दिवसात आम्ही लेहवरुन निघून त्सो-कार मार्गे सरचूला आल्याने 'तांगलांग-ला' हा जगातील सर्वोच्च द्वितीय उंचीचा पास (उंची १७५८२ फुट) आम्ही स्किप केला. तरी सुद्धा 'त्सो-कार - पांगचा रुक्ष वाळवंटी प्रदेश' आणि मग 'नकी-ला, २१ लूप्स - सरचूचा हिरवागार प्रदेशात बाईक चालवायला मज्जा तर आलीच होती त्याशिवाय सर्वांच्याच कणखर मनोवृत्तीचा कस लागला होता. उद्याची आखणी करून आम्ही सर्व झोपी गेलो. उद्याचे लक्ष्य होते बारालाच्छा-ला आणि रोहतांग पास करत मनाली ... अर्थात काश्मिरला टाटा करत हिमाचल प्रदेश मध्ये प्रवेश ...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - रोहतांगचा चिखल सारा ... !
.
.
.

Saturday 28 November 2009

लडाखचा सफरनामा - 'दिपाली'च्या मनातला ... !

लडाखवर माझे लिखाण सुरूच आहे ... पण मध्ये-मध्ये कामामुेळ त्यात थोडा खंड पडतोच. अश्यावेळी अधून-मधून माझ्या लडाख टीम मध्ल्यांचे अनुभव मी इकडे मांडतोय. दिपाली म्हणजे आमच्यामधली सर्वात उत्साही आणि आनंदी. कधीही, कुठेही यायला लगेच तयार. 'लडाख का येणार का?' असे विचारल्यावर एका पायावर तयार झाली होती ही पोरगी. खरे सांगायचे तर लडाखला सर्वात जास्त मज्जा सुद्धा तिनेच केली आहे. तिचे अनुभव तिच्याच शब्दात...

"रोहन.. हा जो काही ब्लॉगचा घाट तू घातला आहेस ना तो मस्तच जमून आलाय. आपण सगळे तर एकत्रच जाउन आलोय तरीही वाचायला खुप उत्सुकता वाटते. आज काय लिहिला असेल बरं? रोज चेक करते. मजा येते वाचायला. अभिजीत आणि रोहन या दोन वेड्यांमुळे मला खूप काही बघायला मिळालय आणि या पुढे सुद्धा मिळेल हे नक्की. आयुष्यात कधी ट्रेकिंग न केलेली मी थेट 'सारपास'ला (हिमाचल प्रदेश) गेले ते या दोघांमूळे. कळवा ते ठाणा, फार-फार तर ठाणे ते अंधेरी हाच सगळ्यात मोठा बाईक वरून केलेला प्रवास. त्यानंतर केला तो राजमाची आणि मग थेट लडाख. माझ्या आयुष्यातल्या या क्षणांमूळे या दोघांच खूप मोठ देणे लागते मी."


"रोज रात्रीची मिटिंग, दिवसाचा क्वार्टर मास्टर कोण बनणार?, डे लीडर कोण बनणार? उदया कस सुटायच याची ठरवा-ठरव, अभि भडकलेला तो प्रसंग, माझी आणि अमेय साळवीची बाईकवरची अखंड बडबड, पांगोंगचा ट्रक प्रवास आणि नंतरच शब्दात पकड़ता न येण्यासारखे दृश्य, मोनेस्ट्रीच शांत आणि हजारो वर्षांपूर्वीच्या काळात नेणार वातावरण, त्सो-मोरिरीला जाताना आर्मीच्या जवानाने बळे-बळेच दिलेले ड्रायफ्रूट्स आणि बिस्किट्स, फोटु-लाची न संपणारी पर्वत रांग, मनाली ते चंडीगढ़मधे अभिला आलेली प्रचंड झोप, तेंव्हा माझ्या आणि अमेयच्या फूल-टू सुटलेल्या गप्पा आणि असे बरेच अनुभव."


"लडाख म्हटला की मनात गर्दी होते आठवणींची. हे १३ दिवस एका दुसऱ्याच जगात वावरत होतो आम्ही."

Friday 27 November 2009

लडाखचा सफरनामा - त्सो-कार - पांगच्या वाळवंटात ... !




पहाटे-पहाटे खोलीच्या छतामधून बारीक माती पडू लागल्याने मला आणि अभिला जाग आली. काय होतय ते समजतच नव्हते. नंतर कळले की छपरावार कोणीतरी नाचत असल्यामुळे असे होत आहे. ते कोणीतरी म्हणजे अमेय साळवी, अमेय म्हात्रे  आणि कुलदीप होते हे नंतर कळले. पहाटे-पहाटे फोटो काढायला हे तिघे छपरावार चढले होते. मला जाग आल्यावर मी इतर सर्वांना जाग आणली हे वेगळे सांगायला नकोच. ७ वाजता चहा घेउन आम्ही निघायची तयारी करू लागलो. पण पूनम काही सापडेना. कुठे गेली होती काय माहीत? नंतर ह्या तिघांचे अजून उपद्व्याप समजले. पूनम सुद्धा छतावर चढल्यानंतर ह्यांनी खालची शिडीच काढून घेतली होती. १५-२० मिं. वरतीच बसून होती. आरडा-ओरडा करत होती. शेवटी तिला खाली घेतले आणि ८ वाजता आम्ही सरचूच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी त्सो-मोरिरीचे सौंदर्य कालच्यापेक्षा वेगळे भासत होते. कालच्या कच्च्या रस्त्याने पुन्हा त्सो-मोरिरीला वळसा मारत आम्ही वाळूच्या पठाराकडे निघालो. वाळू कालपेक्षा जास्त भुसभूशीत जाणवत होती. आमच्या बाईकचा स्पीड फारतर तासाला २० किमी. इतका सुद्धा नव्हता. तेनसिंगला मात्र त्या कच्च्या रस्त्यावरून निघायची भलतीच घाई झाली होती बहुदा. अखेर त्याने चुक केलीच. वाळूच्या त्या रस्त्यात त्याने गाड़ी भलत्याच चिकिच्या बाजूने नेली आणि ...सामानाच्या वजनाने ती अख्खी गाड़ी वाळूमध्ये बसली. त्यात तेनसिंगने गाड़ी काढ़ण्यासाठी ती अजून रेस केली. आता तर ती अक्षरशः रुतली. मागुन येणाऱ्या बायकर्सना ह्याची काही कल्पनाच नव्हती. 'बाजुच्या दुसऱ्या रस्त्याने पुढे या' असे सांगायला दिपाली आम्हाला हातवारे करत होती. अभीला काही ते कळले नाहीत आणि तो पण त्याच रस्त्याने पुढे शिरला. आता त्याची बाईक सुद्धा वाळूत फसली. मग मात्र बाकी आम्ही सर्वजण उजव्या हाताने पुढे गेलो. बघतो तर.. गाड़ी अख्खी बसलेली. पुन्हा एकदा सर्व सामान उतरवले आणि मग 'इरादा पक्का तर दे धक्का' सुरू झाले. आजुबाजुने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे ड्रायव्हर सुद्धा आमच्या मदतीला आले.अखेर अखेरचा 'दे धक्का' करून गाड़ी चांगल्या रोडला आणली.




त्यानंतर आमची हालत काय झाली होती ते खालच्या फोटोंवरुन समजेल. सकाळी ८ वाजता सुद्धा तिकडे असे सणसणीत ऊन होते की चांगलीच धाप लागली होती. पाणी प्यालो.. ताजेतवाने झालो आणि मग पुढे निघालो. चांगला १ तास वाया गेला होता.













आता लवकरात लवकर त्सो-कार मार्गे पांग गाठणे महत्वाचे होते कारण तिकडून पुढे आम्ही दुसरी गाडी केली होती. तेनसिंगला पुन्हा आज लेहला पोचायचे असल्याने तो आम्हाला १२ च्या आत सोडणार होता. पुन्हा एकदा वाळूचे पठार पार करत पक्या रस्त्याला लागलो आणि वेगाने 'सुमधो'कडे निघालो. १० वाजून गेले तेंव्हा फाट्यापाशी आलो. इकडून डाव्या हाताने 'त्सो-कार'कडे निघालो. इकडून पुढचा रस्ता चांगला असेल असे वाटले होते पण नाही; पुढचा रस्ता परत कच्चा आणि वाळूचा. बाईकचा स्पीड देखील २५-३० च्या पुढे नेता येत नव्हता. अशात रस्ता मध्येच खाली-वर जायचा तर कधी अचानकपणे उजवी-डावीकडे. अश्यावेळी मागच्याला बाईक वरुन इतरून चालत यावे लागायचे तर कधी-कधी रायडरला सुद्धा बाईक ढकलत पुढे न्यावी लागायची. ११:३० च्या आसपास अचानकपणे एके ठिकाणी मला गाडी काही कंट्रोल झाली नाही आणि मी-शमिका डाव्या बाजूला वाळूमध्ये धसकन पडलो. इतक्या सावकाश पडलो की कोणालाच काही लागले नाही पण कपड्यात सर्व ठिकाणी वाळू मात्र शिरली. गाडी चालवण्यात आजपर्यंत एकदा सुद्धा ब्रेक न घेतलेल्या अमेय साळवीने त्याची बाईक आता उमेशकडे दिली होती. मी पडल्यावर काही मिंनिट्स मध्ये एका उजव्या चढावर उमेश आणि शोभीत सुद्धा वाळूमध्ये पडले. उमेशच्या हाताला आणि पोटाला मात्र थोड़ेसे लागले होते. सर्वजन तिकडेच थांबलो. ज़रा दम घेतला. 'बरेचदा अपघात परतीच्या प्रवासात होतात'  हे मला पक्के ठावुक होते. त्यामुळे 'ह्या पुढे गाडी अजून नीट चालवा रे' असे सर्वांना सांगून आम्ही पुढे निघालो. निघून ५ मिं. होत नाहीत तो आदित्य-ऐश्वर्याने पुढचा नंबर लावला. कुठूनसा एक कुत्रा भुंकत आला आणि दचकून आदित्यचा तोलच गेला.

त्सो-कारच्या त्या वाळवंटामध्ये अवघ्या १५ मिं मध्ये आम्ही एकामागुन एक असे आम्ही ३ बायकर्स धडपडलो होतो. नशिबाने कोणालाही जास्त लागले नव्हते. गाड्या सुद्धा शाबूत होत्या. कधी एकदाचा हा कच्चा रस्ता संपतोय आणि पक्क्या रस्त्याला लागतोय असे आम्हाला झाले होते. १२ वाजत आले तसे दुरवर त्सो-कार दिसायला लागले. सकाळी १ चहा घेउन निघलेलो आम्ही ह्या आशेवर होतो की किमान त्सो-कारला तरी काही खायला मिळेल. त्सो-कारला उजव्या बाजूने वळसा मारत पुढे निघालो. रस्ता ज़रा बरा होता म्हणुन सर्व बायकर्स वेगाने पुढे निघाले. मी मात्र फोटो घ्यायला ज़रा मागे थांबलो. काही वेळातच काळा कुळकुळीत असा नविनच बांधलेला पक्का डांबरी रस्ता सुरू झाला. 'अरे वा... चमत्कारच आहे ...' असे बोलून मी सुद्धा फटकन बाईकचा वेग वाढवत पुढच्यान्ना गाठले. अवघ्या १ किमी अंतरावर तो 'पक्का डांबरी रस्ता' संपला पण उजव्या बाजूला एक टेंट सदृश्य होटेल दिसले. आम्ही काय केले असेल ते सांगायला नकोच. :D



बाईक्स वरुन उतरलो तेंव्हा आमचा अवतार काय होता... बाईक वर वाळू, सामानावर वाळू, कपड्यांवर - बूटात - अंगावर सर्वत्र वाळूच-वाळू. वाळूमय झालो होतो आम्ही पूर्णपणे. हात आणि तोंड धुवून जेवायला बसलो. 'जे असेल ते आण रे' ... सवयीप्रमाणे तोंडातून वाक्य गेलं. बघतो तर काय... इकडे तर रोटी/चपाती, मसूरची आमटी, भात, अंड आणि मग्गी. वा. मस्त जेवण झाले. तिकडून निघालो तेंव्हा १ वाजून गेला होता. म्हणजे तेनसिंगने गाडी पांगला पोचवली सुद्धा असणार. आता आम्हाला सुद्धा लवकरात लवकर पांगला पोचणे आवश्यक होते. नशीब पुढचा रस्ता परत पक्का होता. १० मिं. मध्ये रस्त्यावर तेनसिंग गाडी घेउन उभा असलेला दिसला. म्हटले हा अजून इकडे काय करतोय. बघतोय तर गाडी मध्ये सामान नहीं की इतर टीम मेम्बर्स सुद्धा नाहीत. तेनसिंग त्यांना मेनरोडला पुढच्या गाड़ी मध्ये बसवून पुन्हा आम्हाला बघायला मागे आला होता. शिवाय पांगच्या दिशेने जाणारा एक शोर्टकट सुद्धा त्याला आम्हाला दाखवायचा होता. अजून एक वाळूने भरलेला कच्चा रस्ता.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - २१ लूप्स टू सरचू ... !.
.
.

Thursday 26 November 2009

लडाखचा सफरनामा - 'त्सो-मोरिरी' अवर्णनीय असे ... !

मोहिमेच्या ९ व्या दिवशी अखेर आम्ही लेह सोडून परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. जम्मू ते लेह ह्या ४ दिवसाच्या आणि लेह मधील ४ अश्या एकुण ८ दिवसात अनेक अनुभव घेउन आम्ही मनाली मार्गे दिल्लीसाठी निघालो होतो. गेल्या ८ दिवसात कारगिल - द्रास, नुब्रा - खर्दुंग-ला, पेंगोंग - चांग-ला अश्या अनेक ठिकाणी भेट देऊन तृप्त झालेले आम्ही आता 'त्सो-मोरिरी'कडे निघालो होतो. लेह-लडाखला येणारे ९९ टक्के लोक मनालीमार्गे 'सरचू'वरुन लेहला पोचतात. आम्ही मात्र नेमका उलटा मार्ग घेतला होता तो ह्या 'त्सो-मोरिरी'साठी.वाकड्या मार्गाने पुन्हा एकदा चीन सीमारेषेवर जायचे आणि मग तिकडून 'त्सो-कार'च्या रस्त्याने खाली सरचूला उतरायचे असे आमचे ठरले होते.


सकाळी नाश्त्याला सर्वजण हजर झाले तेंव्हा ऐश्वर्याला लक्ष्यात आले की गेले २-४ दिवस झाले तिचा 'चीज'चा डब्बा दिसत नाही आहे. "तूला माहीत आहे का रे?" तिने आदित्यला विचारले. तितक्यात दीदी बाहेर आल्या आणि त्यांनी विचारले, "क्या धुंड रहे हो?" तर अमेय हाताने चौकोनी आकार दाखवत बोलला,"वो त्रिकोणी डब्बा था न. वो कहा है?" आता डब्बा होता चौकोनीच. हाताने त्याने सुद्धा चौकोन दाखवला पण बोलला मात्र त्रिकोणी. मी म्हटले काय रे,"आज इतक्या दिवसांनी विरळ हवेचा त्रास व्हायला लागला की काय? हा.. हा.." असो तो डब्बा काही शेवटपर्यंत मिळाला नाही. बहुदा ऐश्वार्याने रात्री झोपेमध्येच तो संपवला असावा. तिलाच लक्ष्यात नसेल बहुदा. हाहा...

८:३० च्या आसपास आवरून झाल्यावर बाइक्स वर सामान लोड केले. गाड़ीचे काही काम असल्याने आम्ही उशिराने निघणार होतो. मी-शमिका, पूनम, साधना आणि शोभित गाडीमधून जाणार असल्याने मागे थांबलो. शिवाय मला शिवायला दिलेले टी-शर्ट सुद्धा घ्यायचे होते. बाकी सर्वजण बाइक्सवर पुढे निघाले. जाण्याआधी 'नबी'च्या फॅमिलीसोबत एक ग्रुप फोटो काढायला आम्ही विसरलो नाही. गेल्या ५ दिवसात खरच अगदी घरच्यासारखे राहिलो होतो आम्ही इकडे. त्यांचा मुलगा असीम तर आम्हाला सोडायला तयारच नव्हता. शेवटी एका मोठ्या चोकलेटवर आम्ही आमची सुटका करून घेतली.पण त्याने पुन्हा यायचे प्रोमिस आमच्या कडून घेतलेच. गाडीचा ड्रायव्हर तेनसिंग गाडी घेउन गेला. तो आम्हाला मार्केट मध्ये मुख्य कमानी खाली भेटणार होता १०:३० ला भेटणार होता तेंव्हा आम्ही सुद्धा शेवटची धावती खरेदी आटपायचे ठरवले. टी-शर्ट साठी इब्राहीमभाईकडे पोचलो तर ते काही तयार नव्हते. जेवढे होते तेवढे घेतले आणि बाकी  सरळ माझ्या घरच्या पत्यावर पाठवून द्यायला सांगितले. उरली-सुरली कामे आटोपली आणि आम्ही सुद्धा ११ वाजता त्सो-मोरिरीच्या दिशेने निघालो.


-आम्ही निघालोय हे सांगायला अभीला फोन लावतोय तर तो काही लागेना तेंव्हा बायकर्स आतल्या रस्त्याला लागले हे समजुन आले. आता लवकरात लवकर अंतर गाठून बायकर्सना कधी गाठतो ते बघायचे होते. तासाभरात म्हणजे १२ च्या आसपास 'उपशी'ला पोचलो होतो. इकडून एक रस्ता मनाली कडे जातो तर दूसरा 'सुमधो' मार्गे 'त्सो-मोरिरी'कडे. सुमधो च्या मार्गाने आम्ही पुढे निघालो तशी सिंधुनदी पुन्हा आमच्या सोबत यायला निघाली. कधी आमच्या सोबत वहायची तर कधी आजुबाजुच्या डोंगरांना वळसा मारत उलट्या दिशेने वाहत जायची. दुपारी १:१५ च्या सुमारास उपशी - सुमधो मार्गावरील 'गयाक' हे महत्वाचे गाव लागले. पण इकडे काहीतरी खायला मिळेल ही आशा खोटीच निघाली. गाडीमध्ये सोबत जे काही होते ते खात-खात तसेच पुढे निघालो. बायकर्सचा सुद्धा पत्ता नव्हता. किती पुढे निघून गेले होते काय माहीत. फोन सुद्धा लागत नव्हते कोणाचे. इतक्यात २ च्या सुमारास 'कियारी' गावापासून ६ किमी. अंतरावर आमची गाडी बंद पडली. सर्व प्रयत्न करून झाले पण काही केल्या सुरू होईना. १ तास असाच वाया गेला. मागुन दुसरी गाडी पाठवायला आम्ही दुसऱ्या एका गाडीसोबत निरोप सुद्धा धाडला. पण निरोप जाउन दुसरी गाडी यायला किमान ३ तास जाणार ह्या अंदाजाने आम्हाला इकडेच संध्याकाळ होणार हे समजुन आले होते. पुन्हा एकदा वेळेचा बट्याबोळ.



असेच रस्तावर बसलो असताना समोरून आर्मीचा कोन्व्होय येताना दिसला. त्यातील जवानांनी थांबून चौकशी केली आणि पुढे 'कियारी चेक पोस्ट जा' कोणीतरी ते फोन लावून देतील असे सांगितले. मग शोभित मागुन येणाऱ्या एका गाड़ीतून पुढे गेला. आम्ही बाकी सर्व तिकडेच बसलो होतो. इतक्यात मागुन अजून एक ट्रावेल्सची गाडी आली. त्यातला ड्रायव्हर तेनसिंगच्या ओळखीचा होता. त्याने चक्क गाडी चालू करून दिली. स्पार्कप्लग मध्ये काहीसा प्रॉब्लम होता. ३ वाजून गेले होते आणि आम्ही अजून त्सो-मोरिरी पासून बरेच लांब होतो. आता अगदी जेवायला सुद्धा कुठेही थांबणे शक्य नव्हते. गाडी सुरू झाल्यावर पुढच्या १० मिं मध्ये कियारी चेकपोस्टला पोचलो. तिकडे शोभित सुद्धा भेटला. कियारी चेकपोस्टला A.S.C. म्हणजेच 'आर्मी सप्लाय कोअर'चा मोठा बेस होता. सध्या तिकडे Bombay Sapers 128 Field Coy स्थित आहे. तिकडच्या सुभेदारने आमची बरीच मदत केली.२-३ तास आधी मुंबईचे काही बायकर्स सुद्धा इकडून पुढे गेले आहेत असे सुद्धा त्यांच्याकडून कळले. भुकेले बायकर्स सुद्धा इकडे थांबले होते. सुभेदारने दिलेले काजू-बदाम आणि केळी खाऊन मग पुढे गेले होते. पण त्या आधी तो सुभेदार शिव्या द्यायला विसरला नव्हता. 'कयू आतेहो यहाँ? क्या देखने? है क्या यहाँ? नंगे पहाड़? पैसा बहोत है क्या तुम्हारे पास. हम को तो आना पड़ता है लेकिन तुम कयू आतेहो?' उद्विग्न मनाने बोलत होता बहुदा. एकजण धीर करून बोलला 'आपसे मिलने आये है साबजी' तसा एकदम खुश झाला आणि मग काजू-बदाम- केळी. ती स्टोरी ऐकून तिकडून निघालो. आवश्यक फोना-फोनी झाली होती. ३:३० होउन गेले होते. अजून सुद्धा बरेच अंतर जायचे होते. केशर, नुर्नीस अशी गावे मागे टाकत आम्ही 'किदमांग'ला पोचलो. डोंगरांनी आपला रंग आता बदलला होता. काळ्यावरुन आता ते जांभळ्या रंगाचे झाले होते. उजव्या बाजूला सिंधुनदी तर डाव्या बाजूला जांभळ्या रंगाचा सडा पसरला होता. त्यांच्यावरुन ऊन परावर्तित झाले की ते लख-लख चमकायचे.

त्या डोंगरांच्या सोबतीने आम्ही ४:३० च्या आसपास 'चूमाथांग'ला पोचलो. पोटात सणसणीत भूक लागली होती. स्त्याच्या दोन्ही बाजूला २ होटल्स बघून आम्ही 'जेवायला थांबुया' असे बोलायच्या आत तेनसिंगनेच गाडी थांबवली. 'खाना खाके आगे जायेंगे' असे बोलून तो उतरला. आम्ही सुद्धा भुकेले होतो. आता इकडे जे मिळेल ते खाऊन पुढे जायचे होते. नेहमी प्रमाणे माग्गी आणि चावल-राजमा. बायकर्स सुद्धा इकडेच जेवून आत्ताच पुढे गेले आहेत असे कळले. २० मिं मध्ये तिकडून जेवून पुढे निघालो आणि ५ वाजता 'माहे' चेक पोस्ट गाठली. तिकडे एंट्री केली आणि 'सुमधो'कडे निघालो. अर्ध्यातासात 'सुमधो' गावात पोचलो. इकडून एक रस्ता 'त्सो-कार'मार्गे पांग-मनालीकडे जातो तर दूसरा आत 'कार्झोक'ला. ७ वाजायच्या आत 'कार्झोक' म्हणजेच त्सो-मोरिरीच्या काठाला असणाऱ्या गावात आम्हाला पोचायचे होते. अजून सुद्धा चक्क ६० किमी अंतर बाकी होते. पाहिले २५ किमी.चा रस्ता चांगला आहे पण नंतरचा कच्चा आहे असे तेनसिंग बोलला होता. 'अब थोडा संभालके बैठो. मै गाडी भगाने वाला हू. अँधेरा होने से पाहिले हमें कार्झोक पहुचना होगा. नहीं तो एंट्री नहीं मिलेगी' असे बोलून त्याने गाडी सुसाट मध्ये घेतली. चांगला रस्ता कमीतकमी वेळेत त्याला पार करायचा होता. तेनसिंगची बडबड सुरूच होती, 'इस ढलान से निचे जायेंगे तो कैमेरा तयार रखना. त्सो-मोरिरी दिखने वाला है आपको पहिली बार. आप फोटो तो निकालेंगे ही. लेकिन ज्यादा टाइम नहीं है अपने पास.' आता आम्ही कैमरे सरसावून बसलो ते त्सो-मोरिरी च्या पहिल्या दर्शनासाठी. आणि पाहतो तर काय ... निळ्याशार पाण्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरांची रेखीव अशी मांडणी. काही हिमाच्छादित तर काही रांगडे. उघडे-बोडके असले तरी आगळेच असे सौंदर्य. मावळतीच्या उन्हाची एक चादर त्यावर पसरली होती. डोळेभरून ते दृश्य पाहून घेतल्यावर कामेर्यात सुद्धा पकडले आणि पुढे निघालो.





.
.


आता पुढे तर संपूर्ण कच्चा रस्ता होता. माती आणि भुसभुशीत वाळू. वाळूचे एक मोठेच्या मोठे पठारच. एकामागुन एक वेगवेगळे  डोंगर, रस्ते बघत आम्ही जगावेगळे अनुभव घेत होतो. त्सो-मोरिरीच्या वरती डाव्या बाजूला दुरवर आता एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र ढगाने स्वतःचे अस्तित्व बनवले होते. एखाद्या चित्रकाराने स्वतःच्या ब्रशने आकाशात एक चित्र निर्माण करावे असा तो पसरला होता. आम्ही जस जसे पुढे जात होतो तसतसे त्या ढगचे रंग बदलत होते. मावळती बरोबर आता सूर्य सुद्धा त्यात स्वतःचा लालसर रंग भरत होता. काही क्षणात पचिमेकड़े कडा पूर्ण लालसर झाली आणि त्याचे प्रतिबिंब त्सो-मोरिरीमध्ये चमकू लागले. ढगाने आणि पाण्याने स्वतःचे आधीचे रंग बदलत नवे रंग धारण केले. निसर्गाचा तो खेळ बघत बघत आम्ही त्सो-मोरिरी च्या अगदी काठावर पोचलो. पुढे गेलेले बायकर्स सुद्धा इकडेच भेटले आम्हाला. आता त्सो-मोरिरीला शेवटचा वळसा मारत आम्ही 'कार्झोक'कडे निघालो. त्सो-मोरिरी म्हणजेच कार्झोक १५०७५ फुट उंचीवर आहे.



बरोबर ६:५० ला आम्ही कार्झोक चेक पोस्टला एंट्री केली आणि रहायच्या जागेच्या शोधात निघालो. इकडे राहण्यासाठी टेंट्स आहेत हे आम्हाला माहीत होते पण ते ३५००/- (डबल बेड) इतके महाग असतील हे नव्हते माहीत. याचे कारण असे की या ठिकाणी येणाऱ्या लोकांमध्ये भारतियाँचे प्रमाण अत्यल्प आहे. येथे सर्व फिरंगी येतात. पुढे कार्झोक गावात स्वस्तात 'होम स्टे' मिळेल असे त्याने आम्हाला सांगितले. पुढे बघतो तर काय... इतक्या आत आडवाटेला १००० च्या आसपास लोकवस्ती असलेले गाव असेल असे आम्हाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. ते सुद्धा स्वतःची बाजारपेठ असलेले. पुढे कार्झोक गावात 'मेंटोक' म्हणुन छोटेसे १ मजली 'गेस्ट हॉउस' सापडले. अवघ्या ४००/- एक खोली. जेवायला सुद्धा बनवून देऊ असे म्हणाले पण शमिका आज जेवण बनवायच्या मुड मध्ये होती. 'तुम्ही फ़क्त सामान दया. आम्ही घेऊ बनवून' असे बोलली. तिला मदत करायला पूनम सुद्धा किचन मध्ये शिरली. बाकी मी, अभी, उमेश, आशिष फोटो ट्रांसफरच्या कामाला लागलो होतो. तर दमलेल्या ऐश्वर्या आणि साधना कधीच झोपी गेल्या होत्या. जेवणाआधी मस्त पैकी चहा-कॉफी झाल्याने सर्वच ताजेतवाने झाले. रात्री १० च्या आसपास शमिका आणि पूनमने बनवलेले चविष्ट जेवण जेवून आम्ही सर्व निद्राधीन झालो. संध्याकाळी त्सो-मोरिरीच्या नितांत सुंदर दर्शनाने पेंगोंगच्या वेळचे दुख्ख थोडे कमी झाले होते. तिकडे नं देता आलेली वेळ इकडे थोड़ी भरून निघाली होती. परतीच्या प्रवासाचा पाहिला टप्पा पूर्ण झाला होता. आता उदया लक्ष्य होते काश्मिरला अलविदा करत पांगमार्गे 'सरचू' गाठायचे.
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - त्सो-कार - पांगच्या वाळवंटात ... !.
.
.
.

Thursday 5 November 2009

लडाखचा सफरनामा - 'मनाली'च्या मनातला ... !

लडाखला जाण्यासाठी जितका वेळ लागला तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्तवेळ हा 'लडाखचा सफ़रनामा' लिहायला लागतोय. काही-ना-काही बारीक-सरिक छोटी-मोठी अडचण येते आहे आणि वेळ जातोय. लिखाणाला वेळ देता येत नाही आहे. असो पण मी लिहित नसलो तरी मागे म्हटल्याप्रमाणे आता आमच्या लडाख मोहिमेमधले एक-एक भिडू त्यांच्या मनातले विचार लिहू लागलेत. अमृता पाठोपाठ आता 'मनाली'ने तिच्या मनातले 'लडाखचे भावविश्व' शब्दबद्ध करून पाठवले आहे. माझ्या हातून सुटलेल्या काही गोष्टी तिने इकडे नेमक्या टिपल्या आहेत.
.
.
.


"गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मधील गोष्ट. आम्ही Y.H.A.I. - 'वाय एच ए आय'च्या कुंभळगड ट्रिपवरुन परतलो होतो. थोडेच दिवस झाले असतील आणि एक दिवस अभि अचानक म्हणाला, "पुढल्या वर्षी जून नंतर आपण लडाख ट्रिप करायची आहे. रोहन आणि माझा कधीपासून विचार आहे, पण पुढल्या वर्षी होऊनच जावूदे." त्यावेळी मनात आनंदाच्या, उत्साहाच्या आणि भीतीच्या कितीतरी भावना एकदम येऊन गेल्या. आम्ही आमचा हा बेत जेव्हा आमच्या मित्र-मैत्रिणींना, घरच्या मंडळींना आणि ऑफीस मधील सहकाऱ्याना सांगितला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर देखील हजार प्रश्न उमटून जायचे. जसे, लेह लडाख आले कुठे? भारतात की भारताबाहेर? पासपोर्ट-विज़ाचे काम झाले काय? ट्रेक आहे की ट्रिप आहे? बाइक ट्रिप म्हणजे मनाली तू सुद्दा बाइकवरुनच जाणार का? जमेल का तुम्हाला? लेह लडाख म्हणजे काश्मिरजवळ, मग ते कितपत सुरक्षित आहे? असे एक-ना अनेक प्रश्न. सुरवातीला मला देखील हे प्रश्न पडले, कारण लडाखला आपण फिरायला जाउ, असा मी कधी विचारच केला नव्हता. पण जेव्हा अभि मला म्हणाला की "आपण लडाखला जातो आहोत" तेव्हा मला जाणवला तो त्याचा स्वतःवरचा आणि माझ्यावरचा विश्वास, की आपण हे करू शकतो. मग मला हे प्रश्न पुन्हा पडले नाहीत."

"साधारणतः जानेवारी ०९ पासून अभिने कामाला सुरवात केली. म्हणजे वेगवेगळ्या वेबसाइट्सना भेट देणे, लडाख भागातील माहिती मिळवणे, जायचा-यायचा मार्ग ठरवणे, एकंदर खर्चाचा अंदाज घेणे, अशा एक ना दहा गोष्टी. त्याने गोष्टींचा आढावा घेतला आणि पहिला ई-मेल पाठवला तो या ट्रिपमध्ये सहभागी होऊ ईच्छिणार्‍याची यादी तयार करण्यासाठी. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. "आम्ही यायला तयार आहोत" असे म्हणणार्‍याची संख्या खूप होती, पण प्रश्न होता सुट्ट्यांचा. मग आम्ही 'शिवाजीपार्क'वर भेटायच ठरवले, म्हणजे सगळ्यांच मुद्यांवर बोलता येईल. या भेटीनंतर बर्‍याच गोष्टी ठरल्या. त्यानुसार ट्रिपचा कालावधी जून बदलून ऑगस्ट ७ ते २२ असा पक्का झाला. आधी ठरलेला मार्ग दिल्ली-मनाली-लेह-कारगिल-श्रीनगर-जम्मू असा होता. तो बदलून जम्मू-श्रीनगर-कारगिल-लेह-मनाली-दिल्ली असा ठरला. आधी आमचा प्लान तेथून बाइक्स भाड्याने घ्यायच्या असा होता पण नंतर आपल्याच बाइक्स इथून लोड करायच्या असे ठरले. ( काय आमच्या बाइक्सचे भाग्य!!! नाही???) सहभागी होणर्‍याचा आकडा मात्र सतत बदलत होता. जो आधी २० होता तो कधी १५ तर कधी १० वर यायचा."

"लग्नाआधी आणि लग्नानंतरही ट्रिपची आखणी करताना मी पहिल्यांदाच इतक्या जवळून आभिला पाहत होते आणि त्यातच माझ्या जॉबमुळे मला त्याला पुरेशी मदत करता येत नव्हती. १५ जणांसाठी १५ दिवसांची ट्रिप तिही लडाखसारख्या ठिकाणी !!! हे काही सोप्पे काम नव्हते. त्यातून ट्रिपमद्ये सहभागी होणर्‍याचा प्रतिसाद वेळच्यावेळी नाही आला की अभिला निर्णय घ्यायला उशीर होत असे. मग त्याची चिडचिड होई. पण या गोष्टी होणार याची त्याला जाणीव होती आणि तरीही आपली ट्रिप चांगली होणार असा विश्वासही होता. एक दोनदा त्याने मला बोलूनही दाखवले की रोहन भारतात असता तर बरे झाले असते. अशी ही लडाख बाइक ट्रिप माझ्यासाठी आधीपासूनच सुरू झाली होती. ही बाइक ट्रिप असल्याने पुरेसा सराव असणे गरजेचे होते. जसे सलग काही तास बाइक चालवणे, तितका वेळ बाइक वर मागे बसणे, गाडीमध्ये काही खराबी आल्यास ती दुरुस्त करणे, इत्यादी इत्यादी. म्हणून आम्ही २-४ सराव ट्रिप्स करायचे ठरवले. त्यानुसार आमची पहिली सराव ट्रिप झाली ती 'राजमाची' येथे (आणि तीच आमची शेवटची सराव ट्रिप ठरली) पण तो अनुभव आम्हाला पुरेसा होता."

"जरा विचार करा ट्रिप आधीचे इतके सारे अनुभव मी तुम्हाला सांगू शकते, तर ट्रिपमध्ये आम्ही किती धमाल केली हे सांगायला मला रोहन सारखा ब्लॉगच लिहावा लागेल... नाही!!! घाबरू नका, मी काही ब्लॉग नाही लिहिणार, पण माझे अनुभव थोडक्यात सांगते. मला सांगायला खूप आनंद होत आहे की ही आमची ट्रिप खूप सुंदर झाली आणि आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरली. आम्ही श्रीनगर सोडले आणि लडाखच्या दिशेने प्रयाण केले आणि एका वेगळ्याच जगात प्रवेश केला. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले डोंगर.. कधी काळा कातळ, कधी दगड, कधी रूपेरी वाळू असे त्यांचे वेगवेगळे प्रकार. ओसाड वैराण जमीन. या ट्रिप दरम्यान आम्ही अनेक नवीन ठिकाणे पहिली. जसे जोझीला, चांगला, खारदुंगला, फोतुला, रोहतांगला असे पास म्हणजे खिंडी, तिकडची सरोवरे म्हणजे 'त्सो' जसे पॅनगॉँग-त्सो, मोरिरि-त्सो. तसेच तेथील लामांची प्रार्थना मंदिरे एत्यादी. ही ठिकाणे पहाणे जितके सुंदर होते, तितकेच तिथे पोहचणे देखिल रोमांचकरक होते."

"आम्हा सर्व मित्रमंडळींची १५ दिवसांची १५ जणांची अशी ही पहिलीच ट्रिप होती. सगळेच ओळखीचे होते. मित्र किंवा मित्रांचे मित्र. बाइक वरुन फिरताना, वेगवेगळ्या ठिकाणाना भेट देताना एकूणच सुंदर अनुभव होता. या ट्रिपमध्ये मला नवीन मित्र मिळाले आणि जुन्या मित्रांचे नवे पैलू कळले."


"आमच्या या प्रवासाचे काही क्षण अत्यंत हृदयस्पर्शी होते. आम्ही या ट्रिपचा कालावधी ७ ते २२ ऑगस्ट असा ठरवीला, कारण 'ऑपरेशन विजय' जे 'कारगिल युद्ध' म्हणून ओळखले जाते; त्याला जुलै ०९ मधे १० वर्षे पूर्ण झाली. दुसरे विशेष कारण असे की यंदाचा स्वातंत्रदिन आम्ही याच भागात साजरा केला. यामुळे आमच्या प्रवासाला एक ध्येय मिळाले. प्रवासात ठराविक अंतरावर महत्वाच्या ठिकाणी आर्मी चौकया लागायच्या. वाटेत किती वेळा आम्हाला बंदुकधारी जवान, त्यांच्या जीप, कॉनवाय्स, बोफोर्स तोफा असे बरेच काही पाहावयास मिळाले. सकाळच्या प्रहरी एक्सर्साइज़ करताना, उन्हात - वैराण जागी त्याना गस्त घालताना पहिले की माझे डोळे पाणवायाचे. त्याग, देशप्रेम, बलिदान यांसारखे शब्द जे केवळ पुस्तकात वाचले होते, ते प्रत्यक्षात पाहाताना काळीज भरून यायचे. आणि त्याना सलाम करायला नकळत हात वर उठायचे. लडाखवरुन परतल्यावर जेव्हा चिनी घुसखोरीच्या बातम्या कानावर आल्या त्यावेळी मनात एक कळ उठली. कारण आज मला जाणीव आहे की, हा आपलाच / आपल्या भारताचाच भाग आहे आणि त्यावर आक्रमण केले जात आहे. म्हणतात ना...

 अज्ञानात सुख असते, पण जेव्हा गोष्टी ज्ञात होतात, खरी बोच तेव्हाच लागते."


"याच ट्रिप दरम्यान मला स्वतःला उमगले की मी सुंदर फोटो काढू शकते. ट्रिप दरम्यान बाइक चालवण्याचे काम अभिकडे असायचे त्यामुळे कॅमेरा माझ्याकडे असायचा. सुरुवातीला चालत्या बाइक वरुन फोटो काढणे जमायचे नाही. कॅमेरा खाली पडेल / खराब होईल अशी भीती वाटायची. मग मीच बाइक वर स्वतःला सेट करून कॅमेरा नीट हाताळू लागले. आणि मग तर आजूबाजूचा निसर्ग पाहून कॅमेरा आत ठेवावा असे वाटेच ना. पाठीवर सॅक, कमरेला पाउच, डोक्यावर हेल्मेट आणि हातात ग्लॉव्स असतानाही फोटो घेताना हात थांबायाचे नाहीत. अशीही ही आमची 'लडाख बाइक ट्रिप' माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली. या आठवणी आम्ही फोटोमधून, डॉक्युमेंटरी मधून साठवून ठेवल्या आहेत. असेच अनुभव पुढे येतील याची खात्री बाळगते. राहून राहून एकाच गोष्टीची खंत वाटते, ही बाइक ट्रिप करायच्या आधी मी माझे ड्राइविंग लाइसेन्स काढायला हवे होते... :( "
.
.
.

Wednesday 28 October 2009

लडाखचा सफरनामा - खर्दुंग-ला १८३८० फुट उंचीवर ... !




दिनांक १६ ऑगस्ट. मोहिमेचा दिवस नववा. आजचे लक्ष्य होते १८३८० फूटावरील जगातील सर्वोच्च रस्ता - खर्दुंग-ला. खुद्द स्वतःला आणि स्वतःच्या बाईकला सुद्धा तिथपर्यंत नेण्यासाठी सर्वजण आसुसलेले होते. या मोहिमेमध्ये अनेक अनुभव आले, येत होते पण हा अनुभव सर्वोच्च असणार होता याची प्रत्येकाला खात्री होती. आपल्या देशामधील सर्वोच्च रस्त्यावरुन बाईक चालवणे हे प्रत्येक 'बायकर'ला वाटत असते. आज आमचे ते स्वप्न पूर्ण होणार होते. सकाळी नाश्ता करून लेह सोडले तेंव्हा पासून मनात एक वेगळीच बेधुंद लहर संचारली होती. खाली येउन लेह मार्केटमध्ये न शिरता मागच्या बाजूने थेट 'खर्दुंग-ला'च्या वाटेला लागलो. अवघ्या ३० मिनिट्स मध्ये 'गंग्लोक' या ठिकाणी १३२०० फुटावर पोचलो होतो. पण तिथे न थांबता आता थेट १८३८० फुटावर थांबायचे असे ठरले होते. मध्ये एके ठिकाणी दगडाचा बेडूक बनवलेला दिसला. रंग मारून डोळा वगैरे काढला होत त्याला. 'त्सोलटोक'मध्ये सुद्धा आम्हाला असाच बेडकासारखा दिसणारा एक मोठा प्रस्तर दिसला होता पण त्याला रंग वगैरे नव्हता फसलेला. हा भन्नाटच होता. आम्ही ह्याला 'खर्दुंग फ्रॉग' असे नाव ठेवले.



वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता ... एक U टर्न आणि मग विरुद्ध दिशेला वळून पुन्हा वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता. जस-जसे वर चढत होतो तसे वाऱ्याचा जोर अधिक-अधिक जाणवत होता. वाऱ्याच्या विरुद्ध बाजूने बाईक फूल रेस केली तरी २०च्या स्पीडला सुद्धा चढत नव्हती तर U टर्न मारून वाऱ्याच्या दिशेने बाईक चढावर सुद्धा ४० च्या स्पीडला व्यवस्थित पुढे जात होती. गंग्लोक मागे टाकत ८ च्या सुमारास १७००० फूटावरील 'साऊथ पुल्लू' गाठले. या ठिकाणी खर्दुंग-लाची दक्षिणेकडची चेकपोस्ट आहे. इकडे कळले की उदया संपूर्ण खर्दुंग-ला कामानिमित्त बंद असणार आहे. आली का अजून एक पंचाइत. आता 'नुब्रा-हुंडर'ला जाउन रहायचा प्लान रद्द करावा लागणार होता. कारण आज राहिलो तर उदया पण रहावे लागणार म्हणजेच परतीच्या प्लानचे वाजले न तीन-तेरा. तेंव्हा न रहता आज संध्याकाळपर्यंत परत यायचा प्रयत्न करायचा असे नक्की केले. तशी तिकडे एंट्री केली आणि पुढे निघालो. ह्या पुढचा रस्ता मात्र कच्चा आहे. कुठे मध्येच रस्ता वरुन वाहणारे पाणी, तर कुठे कडयावरुन घरंगळत आलेले छोटे-मोठे दगड आणि रस्त्यावरील बारीक खडी. लेह पासून ३४ की.मी. च्या अंतरात छोटे-मोठे अडथळे पार करत आम्ही बरोबर ९ वाजता 'खर्दुंग-ला'च्या सर्वोच्च उंचीवर पोचलो. ११००० वरुन थेट १८३८० फुट.


१८३८० फुट... जगातील सर्वोच्च वाहतुकीचा रस्ता. काय वाटत असेल ते शब्दात नाही सांगता येत. संपूर्ण ट्रिपचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. थंडी जास्त नसली तरी जोराचा वारा असल्याने गार वाटू लागले होते. फारवेळ इकडे थांबणे शक्य नसल्याने ते क्षण मनात साठवून घेतल्यावर आम्ही सर्वांनी तिथे काही फोटो काढले. सोबत नेलेला तिरंगा तिकडे फडकवला. हा माझा आणि आशीष दादाचा तिकडे घेतलेला एक फोटो. आमच्यापैकी कोणालाच इकडे श्वास घ्यायचा कसलाच त्रास झाला नाही. अर्थात मनात तशी भीती आधीपासून ठेवून आल्यास तसा त्रास होऊ शकतो. तेंव्हा इकडे यायचे तर मानसिक दृष्टया कणखर होउनच.








अधिक वेळ न दवडता पुढे निघालो आणि १८ की.मी. खाली उतरत उत्तरेकडच्या १६००० फूटावरील 'नॉर्थ पुल्लू' चेकपोस्ट वर पोचलो. तिकडच्या जवानांनी सुद्धा 'आज परत या नाहीतर परवा' असेच सांगीतले. ११ वाजत आले होते आणि अजून बरेच अंतर पुढे जायचे होते. मी-शमिका सुसाट वेगाने सर्वात पुढे निघालो होतो. 'नॉर्थ पुल्लू'नंतर खर्दुंग गाव लागले. तिकडे सुद्धा एक छोटेसे गेस्टहाउस आहे. म्हटले चला अगदीच अडकलोच तर इकडे सोय होऊ शकेल रहायची. खर्दुंग मागे टाकत मी-शमिका पुढे जात होतो पण मागे कोणीच येताना दिसत नव्हते. अखेर बराच वेळाने १२ च्या सुमारास मी एके ठिकाणी थांबलो. दूर-दूर पर्यंत रस्तावर बाईक्स दिसत नव्हत्या. मागुन बाकी सर्व येईपर्यंत मी ब्लॉगसाठी नोट्स काढत बसलो तर शमिका आसपासचे फोटो घेत होती. त्याचवेळी तिने घेतलेला माझा हा फोटो. एक भारीच गंमत आहे ह्या फोटोमध्ये. कळते आहे का ते बघा. मी नोट्स काढत असतानाच आर्मीचा एक ट्रकसमोर येउन थांबला. त्यातल्या जवानाने मला विचारले, 'कुठून आलात? मुंबईहून?' मी म्हटले 'होय'. कोल्हापुरचा होता तो जवान. त्याच्याबरोबर ५ एक मिं. गप्पा मारत होतो तोच मागुन बाकी सर्वजण दिसायला लागले. कोणीतरी आपल्या गावचे भेटले ह्या आनंदात तो पुढे निघून गेला. मला सुद्धा खुप बरे वाटते त्याला भेटून.





सर्व आल्यावर आम्ही ठरवू लागलो. १२ वाजले होते आणि आता निर्णायक वेळ आली होती. काय करायचे? अजून किती पुढे जायचे? हुंडरला पोचणे शक्य होते पण परत येताना उशीर झाला तर? की ईकडूनच परत फिरायचे? असे ठरले की एक वेळमर्यादा नक्की करून त्या वेळेला तिकडून परत फिरायचे. मग जिथे असू तिथून म्हणजे तिथूनच. आता कुठे थांबण्याचा प्रश्नच नव्हता. सुसाट वेगाने सर्वजण पुढे निघालो. अभि-मनाली सर्वात मागे होते. त्यात मनाली तिच्या कॅमेरामधून शूट करत होती. ही क्लिप बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या वळणा-वळणाच्या रस्त्यांवरुन बाईक चालवणे म्हणजे काय मजा असते... काय नशा असते ते... उजव्या हाताला सिंधू नदी सतत साथ देत होती. क्षणा-क्षणाला तिचे पात्र रुंद होत जात होते. आम्ही खाल्सर, डिस्किट अशी महत्वाचे गावे पार करत पुढे जात होतो. मध्ये एके ठिकाणी 'सुमुर' फाटा लागला. या ठिकाणी एक रस्ता हा 'सियाचिन बेस'कडे म्हणजेच 'सुमुर'कडे जातो. या ठिकाणी प्रवेश करायला अजून वेगळी परवानगी लागते. आम्ही मात्र दुसऱ्या रस्त्याने 'हूंडर'कडे निघालो. १ वाजत आला होता आणि अजून सुद्धा हुंडर बऱ्यापैकी लांब होते. उजव्या हाताला सोबत करणाऱ्या सिंधू नदीने आता रौद्र रूप धारण केले होते. एका डाव्या वळणावर तिचे पात्र इतके मोठे झाले की बघून सुद्धा उरात धडकी भरेल. असे रौद्र विस्तीर्ण आणि घोंघावत वाहणारे पात्र मी आधी कधीच पाहिले नव्हते. दोन्ही बाजूला नजर जाइल तिथपर्यंत फ़क्त नदीचे पात्र. नजर अडत होती ती दोन्ही बाजूला असणाऱ्या पर्वत रांगांवर. निसर्गापुढे मनुष्य खरच किती खुजा आहे हे अश्यावेळी कळते. निसर्गत जावे ते ह्याच करीता. आपला असलेला-नसलेला सर्व अंहकार गळून नाही पडला तरच नवल.





रस्ता आता डावीकडे नदी पासून दूर-दूर जाऊ लागला आणि दोन्ही बाजूला दिसू लागले वैराण असे वाळवंट. त्या वाळवंटामधून आता आम्ही जात होतो. दोन्ही बाजूला वाळवंट आणि त्यामधून जाणारा बूमरॅगच्या आकाराचा रस्ता कस मस्त वाटता होता. बाईक चालवायला तर पर्वणीच. ह्या रस्ताला माझ्या 'होंडा युनिकोर्न'ने ह्या ट्रिपमधला सर्वात जास्त स्पीड गाठला. 115 kmph... इतका चांगला रस्ता तर आपल्याकडे सुद्धा नाही आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये BRO च्या 54 RCC ने हा रस्ता अतिशय उत्तम ठेवला आहे. नुब्रा-हुंडर ह्या संपूर्ण भागातल्या रस्त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आम्ही तो रस्ता पार करत हुंडरला पोचलो. सर्वात आधी मी तिकडे पोचतो न पोचतो तोच मला समोर एक बोर्ड दिसला. त्यावर लिहिले होते cafe 125 आणि खाली काय लिहिले होते ते फोटो मध्ये वाचा. आता हा असा बोर्ड दिसल्यावर पुढे काय झाल असेल ते सांगायला हवे का? मी तिकडेच गाडी बाजूला लवली आणि आत नेमकं काय-काय मिळतय ते विचारून आलो. इतक्यात मागून अमेय, अभिजित, आदित्य येताना दिसले. रस्त्याच्या मधोमध उभा राहून मी त्यांना बाईक्स बाजूला घ्यायला लावल्या. अर्थात सर्वांनाच भूका लागल्या होत्या. पण इकडे असे काही खायला मिळेल असे वाटते नव्हते आम्हाला. समोसा - जिलेबी पासून साधा आणि मसाला डोसा सुद्धा मिळत होता इकडे. आम्ही तर अक्षरशह: सुटलो होतो. यथेच्छ जेवलो आणि मग निघालो हुंडर मधील 'डबल हंप कॅमल' बघायला. सहारा मध्ये जसे डबल हंप कॅमल आहेत तसे येथे सुद्धा आहेत. येथे त्यावर बसून राइड्स घेता येतात. पण आम्हाला मात्र वेळ कमी असल्याने ते करता आले नाही. किमान तो बघावा आणि फोटो काढावे तर तिकडच्या लोकांनी ते ऊंट कुठेशी लांब झाडी मध्ये बसवून बांधून ठेवले होते. त्यामुळे त्यांचे फोटो न काढताच आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. राहता आले असते इकडे तर मजा आली असती पण ते काही आमच्या नशिबी नव्हते. दुपारी बरोबर ३:३० ला आम्ही तिकडून परतीच्या मार्गाला लागलो.



आता मी, शमिका, पूनम गाड़ी मध्ये होतो. बायकर्स सुसाट वेगाने मध्येच पुढे जायचे तर मध्येच फोटो काढायला म्हणुन मागे रहायचे. मनालीने येताना सुद्धा एक मस्त क्लिप घेतली आहे ती बघा. पुन्हा तो दोन्ही बाजूला वाळवंट आणि त्यामधून जाणारा बूमरॅगच्या आकाराचा रस्ता लागला. तिकडून खर्दुंग गावात पोचलो तेंव्हा ४:३० वाजत आले होते. बायकर्स मागे राहिले होते म्हणुन एका दुकानात थांबून चहा-कॉफी मागवली. मागाहून बायकर्स आलेच. मग आमच्या बाइक्सना सुद्धा सोबत असलेले एक्स्ट्रा पेट्रोल प्यायला दिले. 'निघा.. निघा .. चला निघा.' मी बोंबा मारत होतो. ५:३० च्या आधी पुन्हा एकदा 'खर्दुंग-ला'चा टॉप गाठायचा होता. गाड़ी मधून निघालो तसे पूनमला लक्ष्यात आले की तिचा कैमेरा सापडत नाही आहे. तिला वाटते की राहिला त्या दुकानमध्येच. पण तो अमेय-कुलदीपने लपवून ठेवला होता. ते तिला समजायला तसा बराच वेळ गेला. दूसरीकडे दिपालीला तिचा कैमेरा कुठे आहे ते आठवत नव्हते. शोभितला दिला आहे की कुठे काय माहीत? सगळा गोंधळ. पण कशासाठी सुद्धा आम्ही थांबलो नाही. पास बंद झाला असता तर आमची बरोबर बोंब लागली असती. खर्दुंगच्या १४७३८ फुट उंचीवरून १८ की.मी चे अंतर वर चढत पुन्हा एकदा १८३८० फुटावर येत खर्दुंग-ला फत्ते केला. एका दिवसात २ वेळा. मला नाही वाटत असे फार कोणी केले असेल. ६ वाजता तिकडे कोणी-कोणी नव्हते. अगदी आर्मीचे जवान सुद्धा बाहेर नव्हते. वारा इतक्या सोसाट्याचा सुटला होता की काही क्षणात आम्हाला थंडी वाजायला लागली. तिकडे फार वेळ न थांबता आम्ही पुन्हा लेहच्या दिशेने उतरत पुढे निघालो. उमेश आता गाड़ीमध्ये होता तर आशिष बरोबर साधना होती. उतरताना आमच्या ट्रिपचा पाहिला अपघात झाला. उतरताना वेग कमीच असल्याने तसे विशेष काही लागले नाही पण पडले दोघे बाईकवरुन. तिघांना सुद्धा काहीच लागले नाही. म्हणजे आशिष, साधना आणि बाईकला सुद्धा. अर्थात हे आम्हाला खाली पोचलो तेंव्हा कळले.


गंग्लोक पार करत ७ वाजता पुन्हा एकदा लेह मध्ये पोचलो. खरंतरं सर्व खोल्या रिकाम्या केल्या होत्या आम्ही सकाळी तरी सुद्धा 'नबी'ने आमची रहायची सोय व्यवस्थित केली. पोचल्या नंतर उमेश सर्वांचे फोटो घेत होता. त्यात हा माझा ८ दिवस बाईक चालवल्या नंतरचा फोटो. मला स्वतःला खुप आवडला. मी टॅन झालो की शाल्मली मला 'करपेला टोस्ट' म्हणते. खाण्याशिवाय तिला काही दुसरे दिसते का. असो.. सर्व आवरून उद्याचा प्लान फायनल केला. उदया सकाळी लेह सोडायचे होते आणि परतीच्या मार्गाला लागायचे होते. इतक्या दिवसात मनात साठवलेले अनेक क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. तिकडून निघूच नये असे वाटत होते पण ते काही शक्य नव्हते. उद्या अजून काय नविन अनुभव येणार आहेत ह्याचाच विचार करत रात्री पाठ टेकली. उदया जायचे होते 'त्सो-मोरिरी'च्या दर्शनाला.
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - त्सो-मोरिरी - अवर्णनीय असे सृष्टिसौंदर्य ... !
.
.
.