Thursday 17 September 2009

लडाखचा सफरनामा - जम्मूसाठी रवाना ... !


२ ऑगस्टच्या रात्री उशिराने 'जम्मू-तवी'साठी सर्व बाइकस वांद्रे (बांद्रा) स्टेशनवर चढवल्या. त्यावेळेला पुढच्या १४ दिवसात नेमके किती कि.मी. होतात ते मोजण्यासाठी आशीषने गाडीच्या स्पीडोमिटरचा एक फोटो घेतला. ७ ऑगस्टला सकाळी अभि- मनाली आणि उमेश, साधना, आदित्य, ऐश्वर्या असे ६ जण जम्मूकडे रवाना झाले. उमेश आणि साधनाने IBN-लोकमतसाठी संपूर्ण लडाख ट्रिपचे कव्हरेज करायचे ठरवले होते. ह्या आधी माझ्याबरोबर दोघांनी 'पन्हाळा - पावनखिंड' मोहिमेचे कव्हरेज केले होते. अमेय म्हात्रे, कुलदिप आणि पूनम हे तिघे १ दिवस आधीच जम्मूला रवाना झाले होते. शनिवार ८ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या वाटेने सर्वजण जम्मूला पोचायच्या आधी त्यांना 'वैष्णवदेवी'ला जाउन यायचे होते. तर आशीष, दिपाली, अमेय साळवी आणि शोभीत हे विमानाने जम्मूला शनिवारी दुपारी लैंड झाले. मला कामावरून निघायला काही कारणाने १ दिवस उशीर झाल्याने मी जम्मूला उशिराने पोचणार होतो.



निघायच्या आधी आणि ट्रेनमध्ये सुद्धा अभि माझ्या आणि शमिकाच्या तिकिट्स बरोबर मारामारी करत होता. मी मुंबईला पोचेपर्यंत मला नविन टिकिट पोचेल ह्यासाठी खटपट शेवटी जमून आली खरी पण आता नविन प्लान प्रमाणे मी जम्मू ऐवजी थेट श्रीनगरला रविवारी दुपारी पोचायचे असे ठरले. नाहीतर माझ्या एकामुळे संपूर्ण टिमला जम्मूमध्ये १ दिवस थांबावे लागले असते आणि पुढचे वेळापत्रक कोलमडले असते. ह्यामुळे आमचा ट्रिपचा पाहिला दिवस मिस होणार असला तरी पुढच्या १३ दिवसांसाठी ते करणे जरुरीचे होते. सर्वजण जम्मूला पोचत असताना मी मात्र जर्मनीमध्ये फ्रांकफर्टच्या विमानतळावर मला मुंबईला घेउन जाणाऱ्या विमानाची वाट बघत बसलो होतो. तेंव्हा माझ्या मनाची काय घालमेल होत होती ते कसे सांगू तुम्हाला ...




दुपारी ३ च्या आत अमेय आणि आदित्यने रेलवे पार्सल ऑफिसमधून त्यांच्या गाडया उचलल्या. पण माझी, अमेय आणि अभीची अश्या अजून ३ गाडया उचलायच्या होत्या. त्यांचे पेपर अभिकडे होते आणि नेमकी (खरं तरं रेलवेच्या शिरस्त्याप्रमाणे असे म्हणायला काहीच हरकत नाही) जम्मू-तवी लेट झाली. ३ च्या आसपास स्टेशनच्या आसपास पोचूनदेखील गाडीला असा काही सिग्नल लागला की काही सुटायचे नाव नाही. संध्याकाळचे ५ वाजत आले तशी दोन्हीकडून फोन फोनी सुरू झाली. आशिष - अमेय स्टेशनवर तर अभी गाडीमध्ये. शेवटी अभी पेपर घेउन गाडी मधून उतरला आणि रेलवे ट्रैकमधून जवळ-जवळ २ कि. मी. पळत-पळत स्टेशनला येउन पोचला. चायला... कमालच केली पठ्याने... अखेर सर्व गाडया उचलल्या. गाडीला कुठे काय डॅमेज झाले आहे ते पाहिले आणि बघतोय तर काय सर्वांच्या गाडीला कुठे ना कुठे डॅमेज झालेलेच होते. ते सर्व नीट करून घेतले. आल्या-आल्या छोटे छोटे प्रॉब्लम सुरू झाले होते. त्यात आम्ही जी सपोर्ट वेहिकल सांगितली होती तो ड्रायवर आलाच नाही. मग सर्व सामान बाइक्सवर लोड फेऱ्या करत जम्मू-काश्मिर टूरिझमच्या हॉटेलवर पोचवले.



त्यावेळेला मी तिकडे मुंबईला पोचलो होतो आणि निघायच्या आधीची आमची शेवटची तयारी करत होतो. इकडे जम्मू-काश्मिर टूरिझमच्या हॉटेलकडे सर्वांचा टिम डिनर रंगला होता. एक वेगळाच उत्साह होता प्रत्येकाच्या चेह्ऱ्यावर. अनेक वर्षांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे ह्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. जेवणानंतर ठरल्याप्रमाणे एक मीटिंग झाली. उदया खऱ्या अर्थाने मोहिमेचा पहिला दिवस होता. सकाळी-सकाळी जम्मूवरुन निघुन संध्याकाळपर्यंत श्रीनगर गाठायचे होते.


पण आम्हाला द्रास - कारगिल - लडाखला जायचा तरी कशाला होतं ??? नेमका ध्येय तरी काय होतं आमचं ???
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - काश्मिर हमारा है ... !
.
.
.

8 comments:

  1. बांद्रा म्हणजे बांद्रा टर्मिनसला ना रे रोहन....

    ReplyDelete
  2. होय. 'बांद्रा टर्मिनस' ... बाहेर गावच्या गाडया तिकडेच येतात ना ... :D

    ReplyDelete
  3. khoop sahi jamlay
    chan challie gadi :)
    eagering waiting for next posts :) :)

    ReplyDelete
  4. मग काय चालणारच ना... गाड़ी चालवत तर गेलो होतो ना आम्ही ... :)

    ReplyDelete
  5. हाहाहा.शिवाय तुझ्या मनाची गाडीही कधीपासून धावत होतीच ना, काय?
    :)

    ReplyDelete
  6. फ्रांकफर्टच्या विमानतळावर मनाची घालमेल .. . ह्या भावना शब्दात नाही व्यक्त करता येत. . .त्या फक्त अनुभवयाच्या असतात. . .तुमची पोस्ट वाचताना तो अनुभव आला!!!मस्त!!!!

    ReplyDelete
  7. होय मनमौजी ... त्या व्यक्त नाहीच करता येत. पण तरी तुम्हाला समजल्या .. धन्यवाद.

    भानस ताई... होय. माझी गाडी ६ वर्षापासून धावत होती. अखेर पोचली लडाखला... :D

    ReplyDelete
  8. malaa kup hevaa vaatatoy!! :( malaa pn yaayachay!! :)

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...